यवतमाळ : भरधाव कारची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : वणी तालुक्यातील सावर्लाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (दि.२८) रात्री घडली. अतुल ऊर्फ आकाश शंकर गाउत्रे (वय २७) आणि अमोल मडावी (वय ३२) दोघेही रा. वणी, अशी मृत तरूणांची नावे आहेत. रानू तुमसाम (वय २८, रा. पोलिस लाईन भीमनगर) असे जखमीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल, अमोल व रानू हे तिघेजण मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून वरोराकडे निघाले होते. वणी ते वरोरा रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी या मार्गावरील एक लेन बंद केलेली आहे. त्यामुळे एकाच लेनमधून दोन्ही दिशेला वाहतूक सुरू आहे. ते तीघेजण त्यांच्या लेनमधून जात असताना विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. ट्रकच्या मागून येणाऱ्या भरधाव कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचा चुराडा झाला. अतुल व मडावी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तर रानू हा रस्त्याच्या बाहेर फेकला गेल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. लोकांनी तिघांनाही तातडीने वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी अतुल व अमोल यांना मृत घोषित केले.
हेही वाचा :