हिंगोली : .. तर पालकमंत्र्यांना प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करू देणार नाही; ‘स्वाभिमानी’चा इशारा | पुढारी

हिंगोली : .. तर पालकमंत्र्यांना प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करू देणार नाही; 'स्वाभिमानी'चा इशारा

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांच्या पीक विम्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्‍या पालकमंत्र्यांना गुरुवारी २६ जानेवारीनिमित्त ध्वजारोहण करू देणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विमा द्यावा तसेच मागील वर्षीचे पीक विम्याचे 13 कोटी 89 लाख रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन शिंदे यांच्यासह शेतकरी उपोषणात सहभागी झाले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यात भगवती येथे जलसमाधी आंदोलन झाले. तसेच गोरेगाव येथे रस्त्यावर दूध फेकण्यात आले तर गोरेगाव-जिंतूर मार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील 33 उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय हिंगोली येथील आगारामध्ये बसवर दगडफेक झाली. ही आंदोलने पाठिंब्यासाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बुधवारी स्वाभिमानीचे वाशिम जिल्हाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या आदेशावरून आपण हिंगोलीत आलो असून, त्यांनी दिलेल्या सूचनेवरूनच पुढील आंदोलन केले जाईल. पीक विम्याचा प्रश्न गुरुवारी सकाळपर्यंत निकाली न काढल्यास गोरेगाव येथील उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेले जाईल. यासोबतच पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा यावेळी इंगोले यांनी दिला.

 हेही वाचा :

 

Back to top button