

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : बोगस फेसबुक मैत्रीच्या माध्यमातून परराज्यातील अल्पवयीन मुलीला फसवल्याची घटना उघड झाली आहे. या मुलीला आर्णीत बोलावून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रकार समाेर आला असून, यामुळे मानवी तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. मानवी तस्करीचा पर्दाफाश २ जुलै रोजी झाला हाेता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शहरातील ड्रिंमलँड सिटी भागातील ज्या घरात अल्पवयीन मुलगी पोलिसांना मिळाली. त्या घरात राहणाऱ्या (३० वर्षीय) महिलेचे बंगळूर मधील एका भोंदूबाबासोबत कनेक्शन असल्याची माहिती समाेर आली आहे.
या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणातील महिलेस ताब्यात घेतले असून मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी बंगळूर पोलिसांकडे तक्रार केली होती.
कर्नाटक पोलिसांत ५ दिवसांपूर्वी मुलीला फूस लावून पळविल्याचा गुन्हा दाखल केला होता.
मुलगी आर्णीत असल्याची माहिती आर्णी पोलिसांनी देताच बंगळूर पोलिसांसह मुलीचे पालक आर्णी पोलीस ठाण्यात आले.
या प्रकरणातील दोन्ही आरोपी तसेच तीस वर्षीय महिलेस कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणाचा तपास बंगळूर पोलीस करणार आहेत.त्या अल्पवयीन मुलीचा फेसबुक मित्र दत्ता हिरामण राठोड (वय 27) हा नांदेड जिल्ह्यातील महाधापूर तालुक्यात राहतो.
तो विवाहित असून त्याला दाेन मुले आहेत. त्याने आपल्या फेसबुक डीपीवर कमी वयाच्या मुलाचा फोटो ठेऊन मुलीला भुरळ पाडली.
अल्पवयीन मुलीसोबत चॅट करून बंगळूरहून पहिल्यांदा नागपूर आणि त्यानंतर आर्णीला बोलावले.
मुलीला वाईट उद्देशाने माहूर येथे तो घेऊन गेला. मुलीजवळ ओळखपत्र नसल्याने व संशय आल्याने त्यांना लॉजची रूम मिळू शकली नाही.
यानंतर मुलीला आर्णीतील ड्रिंमलँड सिटी भागातील एका (30 वर्षीय) महिलेच्या घरी दाेन दिवस ठेवण्यात आले.
आर्णी शहरातील काही युवकांना मुलीच्या पेहराव व वागण्यावरून संशय आल्याने त्याचे बिंग फुटले. याची आर्णी पोलिसांना माहिती मिळाली.
दत्ता राठोड यांच्यासह अर्जुन गणेश आडे (वय 20 वर्षे) राहणार महाधापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. तीस वर्षीय महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
काही दिवसांपासून आर्णीत राहत असलेल्या त्या महिलेचे व अटक झालेल्या दोघांचे बंगळूर येथील भोंदूबाबाचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे मानवी तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय मोठी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अल्पवयीन मुलींना फसवून त्यांची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
अशा प्रकरणातील टोळींवर कारवाई करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कडक शासन व्हावी, अशी मागणी हाेत आहे.
आर्णी पोलीस ठाणेदार पितांबर जाधव, जमादार विजय चव्हाण, मनोज चव्हाण, मिथुन जाधव, राजेंद्र सरदारकर, मारोती मदने, जया काळे यांनी तात्काळ कारवाईची चक्रे गतिमान केली.
परराज्यातील अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.