गुडाळ, पुढारी वृत्तसेवा ः घराची भिंत कोसळून वीट आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने आनंदा ज्ञानु जाधव (वय 65) हा वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना आणाजे (ता. राधानगरी) येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दरम्यान, भिंतीचा काही भाग जाधव यांचे भाऊ दत्तात्रय जाधव यांच्या स्वयंपाक घरात कोसळला. स्वयंपाक करणाऱ्या त्यांच्या सून सौ. राजश्री यांनी आपल्या लहान मुलासह त्वरित बाहेर धाव घेतल्याने दैव बलवत्तर म्हणून हे माय लेक बचावले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आनंदा जाधव हे बिद्री साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार आहेत. सकाळी शेतातून वैरणीचा भारा घेऊन ते आले होते. भिंतीजवळ भारा टाकून ते गोठ्यात चालले असताना अचानक पंधरा फुट भिंतीचा बराचसा भाग जाधव यांच्या अंगावर कोसळला . भिंत कोसळताना आवाज झाल्याने गल्लीतील नागरिकांनी तिकडे धाव घेतली. ढिगारा उपसून जाधव यांना बाहेर काढून उपचारासाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. सरपंच मोहन पाटील, तलाठी सौ. नीता शिंदे, ग्रामसेवक सागर चौगले, पोलीस पाटील संदीप पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. सोळांकूर येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून आणाजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचलतं का 😕