कापूस वेचणाऱ्या महिलेचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : आर्णी तालुक्यातील खेडबीड शिवारात कापूस वेचणाऱ्या महिलेचा गुरुवारी दुपारी कुर्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. छबुबाई संतोष जाधव (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. ती एकटीच कापूस वेचण्यासाठी आपल्या शेतात गेली होती. तिच्या मागून काही जण आले. त्यांनी छबूबाईच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केले. यामुळे छबुबाई रक्ताच्या थारोळ्यात कपाशीच्या तासात पडून राहिली. काही वेळाने शेतात आलेले सासरे लक्ष्मण जाधव यांना छबुबाई रक्ताच्या थारोळ्यात आढळली.
- मेड इन चायना टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही; नितीन गडकरींची स्पष्टोक्ती
- कांदा मक्याच्या शेतात अफूची लागवड ; १२ लाखांचा माल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
सासरे लक्ष्मण जाधव यांनी लगेच सरपंच सचिन आडे व गावकऱ्यांना माहिती दिली. त्यांनी आर्णी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार पितांबर जाधव पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून छबूबाईचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर संशयित म्हणून छबुबाईचा पती संतोष जाधव (४५) आणि तिचा चुलत दीर घनश्याम दुलसींग जाधव (३५) या दोघांना ताब्यात घेतले दारव्हाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.