दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड येथे दत्तवाड दूधगंगा बचाव कृती समिती अध्यक्ष सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळकूड योजनेच्या निषेधार्थ आज मंजुरी आदेशाची होळी करण्यात आली.
दूधगंगा नदीमुळे नदी काठावरील शेकडो गावे सुजलाम सुफलाम झाले आहेत. मात्र कोल्हापूर थेट पाईपलाईन व इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या सुळकूड योजनेमुळे दूधगंगा नदी काठाचे मराठवाडा, विदर्भ होऊन हा भाग दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे इचलकरंजीसाठी मंजूर झालेली अमृत २ ही योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित होऊ देणार नाही, असा निर्धार दत्तवाड दूधगंगा बचाव कृती समिती अध्यक्ष सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी व्यक्त केला. मंजुरी आदेशाच्या निषेधाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंजुरी आदेशाची होळी करण्यात आली.
बुधवार दि. ९ रोजी गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे सुळकूड योजने विरोधात निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मंजूर योजनेच्या विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला.दूधगंगा नदी काठावरील महाराष्ट्र व कर्नाटकातील गावांनाही एकत्रित करून पूर्ण ताकतीनिशी सदर योजनेला विरोध करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.
यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष ॲड. सुरेश पाटील, अशोक पाटील, बसगोंडा तोडकर, सुकुमार सिद्धनाळे, अमित माने, सुरेश पाटील, अण्णाप्पा सिदनाळे, अशोक नेरले, सोमनाथ माने, संजय पाटील, बंडू चौगुले आधीसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.