हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले येथील भूयारी रस्त्यावरील कामातील त्रूटी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व कामातील दिरंगाई बद्दल रेल्वे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव यांना खासदार धैर्यशील माने यांनी धारेवर धरले. येत्या पंधरा दिवसांत कामाचा निपटारा करावा अन्यथा येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा खासदार माने यांनी दिला.
खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले मतदारसंघात सुरू असलेल्या भुयारी मार्गात विलंब होत असून या कामात अनेक त्रुटी उद्भवत आहेत. यामूळे मतदारसंघातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही कामात दिरंगाई व त्रुटी जैसे थे राहिल्याने धैर्यशील माने यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह माने यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. ठेकेदार व रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले व किती दिवसात काम होणार हे लेखी स्वरूपात कळवण्याच्या सूचना माने यांनी दिल्या.
परतीच्या पावसाने हातकणंगले येथील भुयारी मार्गात जवळपास वीस फूट पाणी साचले होते त्यामुळे इचलकरंजी वडगाव वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यामुळे कित्येक तास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. पाण्याच्या निचरासाठी कोणतेही उपायोजना नसल्याने या ठिकाणीही समस्या उद्भवल्या हा विषय माध्यमाने उचलून धरल्यानंतर धैर्यशील माने यांनी तातडीची रेल्वे अधिकाऱ्यांसह पाहणी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार हातकणंगले येथील माणगाव वाडी, हातकणंगले या पुलाची पाहणी केली तसेच आसपासच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी ठेकेदाराच्या उद्धट वर्तनविषयी तक्रार सांगितल्या. यावेळी माने यांनी ठेकेदाराला जाब विचारला. ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी असे खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, नगरसेवक राजू इंगवले, नगरसेवक विजय खोत, नगरसेवक मयूर कोळी, नगरसेवक दिना मोरे, बाबासो ठोंबरे, डॉ. अभिजीत इंगवले, गुंडा इरकर, अजितसिंह पाटील, प्रकाश कांबळे, आबासो ठोंबरे, रणजीत पाटील, स्वप्निल नरुटे यांच्यासह हातकणंगलेतील मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा