

बिरू व्हसपटे
शिरढोण : कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठचा सुपीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात क्षारपडीची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्यात सुमारे १० हजार हेक्टर जमीन पाणथळ व क्षारपड झाल्याची नोंद आहे. पाण्याचा अतिवापर, पुराचे पाणी आणि शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे.
शिरढोण, नांदणीसह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पावसाळ्यात शेतात पाणी साचते. पाणी जास्त दिवस राहिल्याने ऊस, सोयाबीन, भाजीपाला यासह अन्य पिकांचे नुकसान होते. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. क्षारपड जमिनीची सुधारणा करण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे.
शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, बुबनाळ, औरवाड, कुटवाड-हसूर परिसरातील सुमारे १,९१० हेक्टर क्षेत्रासाठी भूमिगत निचरा योजनेचा प्रस्ताव आहे. या कामासाठी मोठ्या निधीची गरज असून, कामाला गती मिळणे आवश्यक आहे.
...प्रशासनाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा
क्षारपडीचा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनी सुटणारा नाही. कृषी, जलसंपदा, मृद व जलसंधारण, महसूल आणि ग्रामपंचायत विभागाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. बाधित क्षेत्राचे नव्याने सर्वेक्षण करून गावनिहाय आराखडा तयार करावा. नाले, चर, भूमिगत निचरा वाहिन्या आणि पाण्याचा उपसा यांची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. मंजूर निधी वेळेत उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
"दत्त पॅटर्न : आशेचा किरण"
शिरोळमध्ये भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणालीच्या माध्यमातून क्षारपड जमीन सुधारण्याचा दत्त साखर कारखाना पॅटर्न यशस्वी ठरला आहे. या पद्धतीने पाण्याचा निचरा करून जमीन पुन्हा उत्पादनक्षम करण्यास मदत होते. त्यामुळे प्रशासनाने या पॅटर्नचा आधार घेऊन तालुक्यातील बाधित क्षेत्रासाठी व्यापक योजना राबविल्यास हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.