कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यातील तेरवाड व राजापूर हे दोन्ही बंधारे आज (दि.११) सकाळी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट, शिरोळ बंधाऱ्याजवळ ३१ फूट तर कृष्णा नदीची राजापूर बंधाऱ्या जवळ १६ फूट ७ इंच पाणी पातळी झाली आहे. आज पहाटे राजापूर बंधाऱ्यातून ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्यात सुरू होता.
दरम्यान, राजापूर बंधाऱ्यावरून सहा इंचांनी पाणी वाहत असून कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या नागरिकांची अशा धोकादायक परिस्थितीतही वाहन चालकांचा प्रवास सुरू आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावर कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला होता. तो आज सोमवारी बंद झाला असला तरी राधानगरी धरणातून ४५५ क्युसेक तर राजाराम बंधाऱ्यातून ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी वाहते झाल्याने मासेमारी करणाऱ्यांची जाळी वाहून गेली आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :