![विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून अन्न शिजवण्यास बंदी; पुरातत्त्व विभागाचा मोठा निर्णय](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2FOnly-For-SHAMBHURAJ-4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
विशाळगड; सुभाष पाटील : किल्ले विशाळगड येथे पशू-पक्षांची हत्या करून अन्न शिजवण्यास बंदी घालणारा आदेश पुरातत्त्व विभागाने लागू केला आहे. शाहूवाडीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, दारु आणि गांजा विक्री तसेच सेवन करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला प्रतिबंध करण्याची मागणी होत होती.
विशाळगडावरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. या आदेशानूसार किल्ले विशाळगडावर पशु आणि पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
किल्ले विशाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून विशेषत: युवा वर्गाकडून दारु, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा अशा गोष्टींची विक्री आणि सेवन केले जात होते असे प्रकार समोर आले आहे. काही युवक गडावर हुल्लडबाजी देखील करीत असतात. या घटनांचा वाढते प्रमाण लक्षात घेता. यासर्व गोष्टीना प्रतिबंध करण्याची मागणी होत होती.
तत्कालीन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनांची गंभीर देखील घेत अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पाच पथकांकडून विशाळगडावर विशेष मोहिमही राबवण्यात आली होती. दरम्यान आता विशाळगडावरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागानं पुढाकार घेत एक आदेश जारी केला आहे.
किल्ले विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचं अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे शिवप्रेमींकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत गजापूर-विशाळगडच्या वतीने मुबारक उस्मान मुजावर यांना विशाळगड येथे उघड्यावर विनापरवाना बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात कोंबडी, बकरे यांची कत्तल करीत असल्याने गडावर दुर्गंधी,अस्वच्छता, रोगराई पसरून सामाजिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कायदेशीर परवाना घेतल्याशिवाय पशु-पक्षी हत्या करू नये अशी नोटिसद्वारे सूचना दिल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या १९९८ च्या आदेशानुसार देवी देवतांच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी पशुपक्षी बळी देण्यास मनाई केली आहे. विशाळगड येथे पशु-पक्षी हत्या बंदीचा आदेश निघाल्याने गडावरच फक्त बंदी असेल की गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात ही बंदी आदेश लागू असेल याबाबत चर्चा केली जात आहे.
विशाळगडावर पशु-हत्या करू नये,अशी मागणी अनेक शिवप्रेमीं संघटनेकडून होत होती. या मागणीला अखेर न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केल्या. पशु-पक्षी हत्या करून अन्न शिजविण्यास बंदी घातल्याने शिवप्रेमींतुन या निर्णयाचे स्वागत होत आहे.
हेही वाचा;