विशाळगड : सुभाष पाटील : शिवकाळात १२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. इतिहासातील या देदीप्यमान घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने 'पन्हाळा ते पावनखिंड' पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. ही मोहीम कोल्हापूरचे एक ऐतिहासिक वैशिष्ट्य बनली आहे. यात राज्यासह देशभरातील साहसवीर, इतिहासप्रेमी प्रतिवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. संपूर्ण जुलै महिना या मोहिमेने व्यापलेला असतो. प्राणार्पण करणाऱ्या शिवभक्त मावळ्यांना आणि ते लढलेल्या रणभूमीला अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षी 'पन्हाळगड ते पावनखिंड' अशी साहसी पदभ्रमंती होत असते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची प्रदीर्घ परंपरा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासातही अशीच एक अलिखित परंपरा आहे. ही परंपरा म्हणजे 'पन्हाळगड ते पावनखिंड' अशी साहसी पदभ्रमंती मोहीम. प्रतिवर्षी या धारकऱ्यांच्या वारीला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. ही वारी महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून या वारीला देशभरातून इतिहासप्रेमी, शिवभक्त धारकरी येऊ लागल्याने याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.
सन १६६० साली पन्हाळ्याला आदिलशहाचा सरदार सिद्धी जौहरचा वेडा पडला. सुमारे चार महिने आणि भर पावसातही हा वेडा कायम होता. या वेढ्यातून शिताफिने निसटण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. १२ जुलै १६६० रोजीच्या पौर्णिमेच्या रात्री अंधाराचा फायदा घेत बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी योजना आखली. सैन्याचे दोन भाग करून दोन पालख्यांबरोबर त्यांना दिले. एका पालखीत शिवाजी महाराज स्वतः बसले तर दुसऱ्या पालखीत स्वतः सारखा हुबेहूब दिसणारा शिवा काशीद या गुप्त हेराला बसविले. पन्हाळगडावरून एकाचवेळी दोन पालख्या निघाल्या. एक पालखी राजमार्गावर तर दुसरी चोरवाटेने बाहेर पडली. योजनेनुसार शत्रूला चकविण्याची युक्ती सफल झाली. शिवछत्रपती विशाळगडाकडे सुखरूप रवाना झाले. इकडे राजमार्गावरून जाणाऱ्या शिवा काशिद यांच्या पालखीला शत्रू सैन्याने ताब्यात घेतले. शिवाजी हाती लागल्याच्या आनंदात शत्रूच्या गोटात जल्लोष सुरू झाला. मात्र हा जल्लोष फार काळ टिकला नाही. हा शिवाजी नसून त्यांच्या वेशातील बहुरूपी असल्याचे समजताच चिडलेल्या शत्रुने शिवा काशिदांना मारून टाकले.
'शिवाजी निसटला' ही बातमी क्षणार्धात सर्वत्र पोहोचली. शत्रू सैन्याने लगबगीने पाठलाग केला. पायी जाणाऱ्या शिवरायांना व त्यांच्या सहकार्यांना चौकेवाडी (सध्याचे पांढरेपाणी) येथे गाठले. प्रचंड रणकंदण सुरू झाले. बाजी व फुलाजी प्रभू देशपांडे, संभाजीराव जाधव व बांदल-मराठा मावळ्यांनी शिवछत्रपतींना विशाळगडापर्यंत सुरक्षित पोहोचवले. स्वराज्य आणि शिवछत्रपतींच्या रक्षणासाठी शिवा काशिद, बाजीप्रभू व फुलाजीप्रभू देशपांडे, संभाजीराव जाधव आणि असंख्य शिवनिष्ठ मावळ्यांनी प्राणार्पण केले. या पाठीमागे त्यांची एकच भावना होती. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे'.
इतिहासातील अशा या दैदिप्यमान स्मृती जपण्यासाठी शिवभक्त व इतिहासप्रेमी संस्था संघटनंतर्फे प्रतिवर्षी 'पन्हाळगड ते पावनखिंड' अशा साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. बोचरा वारा, प्रचंड पाऊस आणि सह्याद्री पर्वतरांगेतील काटे-कुटे, चिखल, दगड-धोंड्यानी माखलेल्या खडतर डोंगरदर्यांच्या मार्गावरून ही पदभ्रमंती होते. पन्हाळगडावरून सुरू होणारी ही पदभ्रमंती मोहीम राजदिंडीमार्गे मसाई पठार, कुंभारवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, पांढरेपाणी मार्गे पावनखिंड अशी काढली जाते. सुमारे ७० किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत रणभूमीचे पूजन, वीरांना अभिवादन, शिवनामाचा अखंड जयघोष, वीरश्री निर्माण करणारे पोवाडे, इतिहास तज्ञांचे मार्गदर्शन, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमानी हा खडतर मार्ग सुद्धा सुखकर होतो.
मैत्रेय प्रतिष्ठान (२ जुलै, एक दिवसीय ), हिल रायडर्स (१ व २ जुलै), मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था (८ व ९ जुलै), ड्रीम बॅक पॅकेर्स (८ व ९ जुलै ), भटकंती महाराष्ट्राची (८ व ९ जुलै), शिलेदार अॅडवेंचर्स (८ व ९ जुलै ), स्वराज्याचे शिलेदार (७ -८-९ जुलै), डेक्कन हायकर्स (८ व ९ जुलै), कोल्हापूर हायकर्स (८ व ९ जुलै), VGS अॅडवेंचर्स (८ व ९ जुलै ), सह्याद्री ट्रेकर्स (८ व ९ जुलै ), मुलूखगिरी (८ व ९ जुलै), एक ऐतिहासिक भटकंती ( ८ व ९ जुलै), हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा (९ व १० जुलै), सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर (१२ व १३ जुलै), स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा (१५ व १६ जुलै), उत्सव इव्हेंट्स कोल्हापूर मर्दानी खेळ (१५ व १६ जुलै), हिंदवी परिवार (१४-१५ -१६ जुलै), इचलकरंजी गिरिभ्रमण संघटना (२२ व २३ जुलै ), ताराराणी एक्सपीडीशन कोल्हापूर (२२ व २३ जुलै), शिलेदार अॅडवेंचर्स (२२ व २३ जुलै), हिल रायडर्स (२२ व २३ जुलै), शिलेदार अॅडवेंचर्स (२४ व २५ जुलै), हिल रायडर्स (१२ व १३ ऑगस्ट), मैत्रेय प्रतिष्ठान २९ जुलै (एकरात्रीय मोहीम), १३ जुलै स्वराज्य प्रतिष्ठान शाहुवाडी.
हेही वाचा :