कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : hasan mushrif vs BJP : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर १२७ कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या उद्या जिल्हा दौऱ्यावर असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी तब्येत उत्तम, काळजीचे काहीही कारण नाही, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी सोशल मीडियातून केले आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात आलेच आहेत तर जाता-जाता सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची झालेली वाताहत, भुईसपाट झालेला पक्ष याचीही माहिती आवर्जून घ्यावी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे वागावे आणि लढावे.
कारखाना दहा वर्षांपूर्वी उभारला आहे आज याबाबत चर्चा का व्हावी? शिळ्या कढीलाच नव्याने उत आणत आहेत. त्यांनी जरूर चौकशी करावी. परंतु; स्टंटबाजी करून बदनामी कशासाठी? कृपया जनतेने संयम ठेवावा. कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी.
माझ्या २० वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर जाहीर काय, साधी दबक्या आवाजातसुद्धा चर्चा झाली नाही. दरम्यान, पाठीमागील पाच वर्षात भाजपच्या काळात चिक्की घोटाळा, जमीन घोटाळा, गृहनिर्माण घोटाळा, चंद्रकांत पाटलांचा हायब्रीड ॲन्युटी घोटाळा या प्रकारची एकही चर्चा झालेली नाही.
या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक, जनता दल अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख नेते, कार्यकर्ते व जनतेने मला मोठे पाठबळ दिले. ज्यांनी-ज्यांनी मला या लढाईत पाठबळ दिले, त्या सर्वांचा मी सदैव ऋणी आहे. बदनामी खटल्यासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले त्यांचेही मनःपूर्वक आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="39600"]