कबनूर : पुढारी वृत्तसेवा : कबनूर जलस्वराज्य प्रकल्पाला थकीत वीज बील भरण्यासाठी पतसंस्थेने रक्कम दिली होती. ती रक्कम पतसंस्थेला परत का दिली नाही. यावरुन शनिवार (दि.२४) दुपारी कबनूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेवेळी सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये राडा झाला. दोन सदस्यांनी सभागृहातच एकमेकांविरुध्द दंड थोपटले. एवढ्या वरच न थांबता त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या टेबलावर आपटून फोडल्या. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते.
ताराराणी आघाडीच्या एका सदस्याने आमदार प्रकाश आवाडेंनी सांगून देखील पतसंस्थेची रक्कम का देत नाही ? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांचे ऐकायला आवाडे आमचे नेते आहेत का ? असा सवाल सत्ताधारी गटाच्या सदस्याने केला. यावरुन वादास सुरवात झाली. दरम्यान, सत्ताधारी गटाच्याच एका महिला सदस्याने निवडणुकीसाठी आलेल्या खर्चाचे ५ ते ६ लाख रुपये आवाडेंना द्यायला लावा; मग नगरपरिषद करायला सांगा, असे सुनावले. नगरपरिषद कशी होते, तेही आम्ही बघतो, असे एका सदस्याने म्हटल्याने वादात आणखीनच भर पडली.
दरम्यान, ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभा झाल्यानंतर आमदार आवाडेंची भेट घेऊन सभेत झालेला प्रकाराची माहिती त्यांना दिली. आता येथून पुढे ग्रामपंचायत कारभारात सत्ताधारी गटाचे सदस्य विरुध्द ताराराणी गटाचे सदस्य असा उघड संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :