

Jayant Patil Travels In CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी रविवारी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्रित विमान प्रवास केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. या तिन्ही नेत्यांच्या अचानक झालेल्या एकत्रित प्रवासामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे आज रविवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही त्यांच्यासोबत आहेत. तर जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर या मतदारसंघाकडे रवाना झाले. यावेळी या तीनही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास करत कोल्हापूर विमानतळ गाठले. मात्र मुख्यमंत्री अन् जयंत पाटील यांच्या एकत्र दिसण्याने जुन्या चर्चेला नव्याने ऊत आला आहे.
जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही पहिलीच भेट नाही. यापूर्वी जुलै महिन्यातही जयंत पाटील यांनी 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरून ही भेट झाल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता; मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सत्ताधारी भाजपसोबत वाढणारा संवाद या दृष्टीने या भेटी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या (अजित पवार गट आणि शरद पवार गट) संभाव्य विलिनीकरणाची आणि भाजपसोबतच्या सहकार्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यातच शरद पवारांच्या पक्षाचे खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असतानाच, दुसरीकडे फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात झालेला हा विमान प्रवास अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
हा केवळ एक योगायोग आहे की भविष्यातील नव्या राजकीय भूकंपाची नांदी, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.