कोल्हापूर : ‘नीट’, ‘नेट’ परीक्षेतील गैरप्रकारांमुळे एकीकडे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. दुसरीकडे नेट परीक्षेबाबत यूजीसीकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागला आहे. विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी यावर्षी 5 मे रोजी झालेल्या परीक्षेला जिल्ह्यातून 7 हजारांहून अधिक विद्यार्थी बसले. निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. काही राज्यांतील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या. सर्वोच्च न्यायलायाने 1,563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश दिले. त्यांची 23 जून रोजी परीक्षा घेण्यात आली. 3 जुलैला निकाल जाहीर झाला. 8 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतरच नीटची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने (यूजीसी) यावर्षी 18 जून रोजी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) घेण्यात आली. जिल्ह्यातून 10 हजार विद्यार्थी बसले. पेपर झाल्यावर 19 जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षेतील गोंधळ व अनियमितेमुळे पेपर रद्द केला. नेटची परीक्षा रद्द होऊन 15 दिवस होत आले, तरी अद्याप पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याबाबत यूजीसीने निर्णय घेतलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नोकर भरती व नामांकित संस्थेत संशोधनासाठी प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.
पेपरफुटीमुळे नीटचा गोंधळ देशभर गाजलेला असतानाच यूजीसी-नेट परीक्षेचा पेपरदेखील फुटल्याने परीक्षेचे नियोजन कोलमडले आहे. या दोन्ही परीक्षा एनटीए या केंद्रीय संस्थेकडून घेतल्या. भोंगळ कारभारामुळे परीक्षा घेणार्या संस्थांची विश्वसार्हता धोक्यात आली आहे.