बेळगाव : सध्या देशभरात नीट (राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा) घोटाळा गाजत आहे. अशाच प्रकारचा नीट घोटाळा बेळगावातही झाला असून, याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तुमच्या मुलाला नीटमध्ये जादा गुण मिळवून देत एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो म्हणून एकाने बेळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या तपासात त्याने काहीजणांकडून 1 कोटी 30 लाख रुपयांची रक्कम उकळली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही फसवणूक करणारा पेशाने वकील असून याचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचेही समोर आले आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीटमध्ये देशभरातील 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण घेतल्याने एकच खळबळ उडाली. दरवेळी देशभरातून परीक्षा देणार्या लाखो विद्यार्थ्यांपैकी कमाल 2 ते 3 विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेत होते. परंतु, यावेळी तब्बल 67 विद्यार्थ्यांनी पैकीच्यापैकी गुण घेतल्याने हा देशभरात चर्चेचा विषय ठरला अन् नीट घोटाळा समोर आला. महाराष्ट्रातील बीड, लातूर, राजस्थानमधील कोटा तसेच बिहार व उत्तर प्रदेशात या नीट घोटाळ्याचे जाळे पसरल्याचे तपासात समोर येत आहे. असे असताना बेळगावातही नीट घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस येत असून, पोलिसांकडून याचा वेगाने तपास सुरू आहे. परंतु, या तपासाबाबत पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली असून, या गंभीर प्रकरणाचा लवकरच भांडाफोड करण्याची तयारी चालवली आहे.
ज्याने फसवणूक केली आहे, ती व्यक्ती पेशाने वकील असल्याचे समोर आले आहे. नीटचे गुण वाढवण्याबरोबरच एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगत या व्यक्तीने अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. अनेकांनी त्याला 5 लाखांपासून 25 लाखांपर्यंत रक्कम दिली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर, उद्योजकांसह काही प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश आहे. आपल्या मुलाला एमबीबीएस प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करणारे अनेक पालक त्याच्या आमिषाला बळी पडले आहेत.
या संशयिताने फक्त बेळगावच नव्हे, तर बंगळूर, हुबळी-धारवाड, दावणगेरी, मंगळूर, मुंबईसह अनेक ठिकाणच्या पालकांना फसवल्याचे समोर येत आहे. तुमच्या मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळणारच, असा पालकांचा विश्वास जिंकत त्याने अनेकांकडून रक्कम उकळली आहे. त्याच्याकडून माहिती घेणे सुरू आहे. त्याच्याकडून आतापर्यंत तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 5 ते 25 लाखांपर्यंत घेतलेली ही रक्कम 1 कोटी 30 लाखांच्या घरात पोहोचलेली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती घेतल्यानंतर आणखी मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी फसलेले लोक तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता असून, हा घोटाळा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
सदर व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर अशी काही छाप पाडते की, ती पाच मिनिटे बोलल्यानंतर कोणीही उच्चशिक्षितदेखील त्याच्या बोलण्याला फशी पडू शकते. पेशाने वकील असलेल्या या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात समोरच्याला भुलवून पैसे कसे काढायचे हे माहिती आहे. आपली ओळख मंत्र्यांपासून प्रत्येक वैद्यकीय कॉलेजच्या संस्थापक व अध्यक्षांपर्यंत असल्याचे सांगून तो लिलया समोरच्याला फशी पाडतो. त्याच्या याच बोलण्याला भुलून अनेक नामांकित डॉक्टरांनीदेखील त्याला मोठी रक्कम दिल्याचे समोर येत आहे.
जेव्हा नीटचा निकाल जवळ आला होता तेव्हा या संशयिताने प्रत्येकाला त्यांना जेथे प्रवेश दिला जाणार आहे, असे सांगितले, त्?या वैद्यकीय कॉलेजमध्ये जाऊन थांबण्यास सांगितले होते. तुम्ही कॉलेजच्या बाहेर जाऊन थांबा, तुम्हाला तेथे एक व्यक्ती येऊन भेटेल. तो तुम्हाला थेट कॉलेजमध्ये घेऊन जाईल अन् तुम्ही एमबीबीएसला प्रवेश घेऊनच बाहेर पडायचे, असे अनेकांना त्याने सांगितले होते. त्यानुसार अनेक पालक आपल्या पाल्याला घेऊन दावणगेरी, मंगळूर, बंगळूरसह त्याने दिलेल्या कॉलेजच्या ठिकाणी जाऊन थांबले. दहा वाजता येणारा त्यांचा माणूस दुपारी तीन वाजले तरी काही आला नाही. यानंतर सायंकाळी त्याला फोन करून कोणीही आले नाही, अशी विचारणा केली असता परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे प्रवेश काही दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुम्हाला प्रवेश मिळवून देतो, असे म्हणत तो समोरच्याचा विश्वास पुन्हा देत होता.
ज्यांच्याकडून त्याने नीटचे गुण वाढवण्यासाठी व एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी रक्कम घेतली होती. त्यांनी त्याला रक्कम परत देण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, तो प्रवेश मिळवून देतोच, असे सांगून टाळत होता. परंतु, देशभर जेव्हा नीट घोटाळा उघडकीस आला तेव्हा ज्या पालकांनी पैसे दिले आहेत त्यांना आपण फसलो असल्याचा साक्षात्कार झाला. यापैकीच एका पालकाने पोलिस ठाणे गाठून याची तक्रार केल्यानंतर याचा तपास सुरू झाला अन् या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.