![कोल्हापूर: विशाळगड- गजापूर मार्गावर कासारी नदीत कार कोसळली](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2Fvishalgad.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी शाहूवाडी तालुक्यातील गजापूर वासीयांना आला. विशाळगड मार्गावरील गजापूर पैकी बौध्दवाडी येथील पुलावर झालेल्या दुर्दैवी घटनेत हातकणंगले येथील पाच जण दैव बलवत्तर म्हणून बचावले. या अपघातात चालकांसह दोघे जखमी झाले आहेत. पुलानजीक वीस फूट खोल कासारी नदीत गाडी कोसळूनही पाचजण बचावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झालेली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, हातकणंगले येथील पाचजण कार (एम एच ०९ डीए १५३७) मधून विशाळगड देवदर्शनासाठी आले होते. दिवसभर गड पाहून ते सायंकाळी विशाळगडहून परत निघाले होते. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर पैकी बौध्दवाडी येथील पुलाच्या वळणावर चालकाचा वाहनांवरील ताबा सुटून कार पुलावरून वीस फूट खोल नदीपात्रात कोसळली. कासारी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पुलाच्या शेजारी दगडाचे पिचिंग केल्याने त्यावरून कार वेगाने नदीपात्रात कोसळली. यामध्ये चालक शुभम कोळी (वय २८) याचा पायाला दुखापत झाली. तर यश हाप्पे (वय १०, दोघेही रा हातकणंगले, जि कोल्हापूर) या बालकाच्या डोक्याला लागल्याने दोघेही जखमी झाले. उर्वरित तिघेही हातकणंगले येथील आहेत. उर्वरित तिघांना काहीही लागले नसल्याचे लोकांनी सांगितले. रात्री उशिरा जखमींना १०८ मधून कोल्हापूर येथे खासगी दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा