कोल्हापूर : कुटुंबीयांच्या विरोधामुळे रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगुलाने जीवनयात्रा संपविली
यड्राव : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. किरण अमोल कांबळे (18) व साहिल राजेंद्र कांबळे (25, दोघे रा. टाकवडे, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.
प्रेमाला कुटुंबीयांकडून विरोध होत असल्याने दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
टाकवडेमध्ये एकाच गावात राहणार्या किरण व साहिलचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी दोघांनाही समज दिली होती. किरण ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती; तर साहिल हा पेंटिंगसह तारदाळ येथील एका फौंड्री कारखान्यात कामास होता. किरण सकाळी कॉलेजला जातो, असे सांगून बाहेर पडली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास साहिल व किरण हे दोघेही मोटारसायकलवरून तारदाळ येथील फिल्टर हाऊसजवळ रेल्वे रुळाशेजारी बराच वेळ बोलत बसल्याची माहिती शेतकर्यांनी दिली.
दरम्यान, हातकणंगलेहून जयसिंगपूरकडे जाणार्या रेल्वेखाली दोघांनीही एकाच वेळी उडी घेऊन जीवन यात्रा संपविली. काही वेळातच येथून जाणार्या शेतकर्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेजारीच असणार्या कारखान्यात साहिलचा भाऊ कामास आहे. त्याने घटनास्थळी येऊन मृतदेहांची ओळख पटवली. शहापूर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अर्चना पाटील, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, रवी पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पाठवला.
हेही वाचा :