Bidri Sakhar Karkhana Election Live | सत्ताधारी गटाची आघाडी; कार्यकर्त्यांचा जल्लोष
बिद्री; पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत राधानगरीतील ५१ गावे, कागलमधील ४८ गावे व भुदरगडमधील २१ गावातील मतमोजणी झाली. १२० टेबलवर मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत दोन्ही आघाडींना राधानगरीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी सत्ताधाऱ्यांचे 'विमान' सुसाट असल्याचे चित्र आहे. आता दुसऱ्या फेरीतही सत्ताधाऱ्यांनी आघाडी कायम राखली तर पुन्हा के पी पाटील यांची सत्ता येऊ शकते.
Live Updates :
- सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.
- ६ वा. पर्यंत अंतिम निकाल स्पष्ट होणार
बिद्री सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी ६ वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
सत्ताधारी गटाला सुमारे १६०० मतांची आघाडी मिळताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. सत्ताधारी गटाने १२० टेबलावरील आकडेवारीत मतांचा वरचष्मा ठेवला. राधानगरीतून ए. वाय. पाटील यांना काही गावात फारसे मताधिक्य घेता आले नाही. त्यामुळे सत्ताधारी गट आघाडीवर राहिला. कल लक्षात येताच ए. वाय. पाटलांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला.
बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान अनेक मतपेट्यांमधून दोन्ही आघाडीच्या नेत्यांची कान उघाडणी करणार्या चिठ्ठांचा पाऊस पडला आहे. मतदारांनी चिठ्ठांमधून नेत्यांना चांगलच सुनावलं आहे.
१२० मतमोजणी टेबलवर दोन्ही आघाडींना समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राधानगरी तालुका गट क्रमांक १ पासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.
राधानगरी तालुका गट क्रमांक १ पासून मतमोजणीला सुरूवात
बिद्री कारखान्याच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. कोल्हापूरातील मुस्कान लॉन येथे ही मतमोजणी होत आहे. राधानगरी तालुका गट क्रमांक १ पासून मतमोजणी सुरु झाली आहे. प्रारंभी गट क्रमांक १ मधील केंद्रावरील मतपेट्या उघडण्यात आल्या. मतपत्रिकांचे शॉर्टींग करण्याचे काम सुरु आहे. एका मतपेटीसाठी चार अधिकारी काम पाहत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत सूचना दिल्या. संपूर्ण मतमोजणी पारदर्शी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
'बिद्री' रथी-महारथींच्या भवितव्याचा फैसला
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रथी-महारथी उतरल्यामुळे अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. प्रथम एकतर्फी वाटणारी निवडणूक राजकीय उलथापालथीमुळे अॅक्शन मोडवर आल्याने कमालीच्या चुरशीने ८९.०३ टक्के मतदान झाले. दोन्ही आघाड्यांना विजयाची खात्री असली तरीही गुलाल कुणाला, हे मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे कार्यक्षेत्राबरोबर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बिद्री निवडणुकीचे रविवारी मतदान झाले. 56 हजार 91 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 25 संचालक मंडळाच्या जागेसाठी अपक्षांसह 56 उमेदवार रिंगणात आहेत. बिद्री परिसरात सतर्क असणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन उमेदवार ताकद आजमावत आहेत. गत निवडणुकीत 80 टक्के मतदान झाले होते. सुमारे 1200 ते 4500 मताधिक्य सत्ताधारी गटाने मिळविले होते.
यावेळी मताचा टक्का वाढला आहे. तो कुणाला लाभधारक ठरेल याची चर्चा सुरू आहे. निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली होती. दरम्यान, बंद मतपेटीतील सभासद मतदारांनी कौल कुणाच्या बाजूने दिला हे मंगळवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, कागलचा शाहू समूह, पाच माजी आमदार, दोन पक्षांचे जिल्हाध्यक्ष, गोकुळचे अध्यक्ष यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणीचा इतिहास
सहकारातील बिद्रीची निवडणूक असली तरी यामागील निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाल्याचा इतिहास आहे. याही निवडणुकीत मोठ्या उलथापालथी होत दुरंगी सामना पाहावयास मिळाला. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा सामना रंगला. निवडणुकीत दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन राष्ट्रीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, गोकुळचे अध्यक्ष यांनी एकमेकांच्या विरोधात रान उठविले आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक जोशपूर्ण झाली. मिनी विधानसभेची रंगीत तालीम पहावयास मिळाली.
केंद्रास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अंबरिशसिंह घाटगे, शशिकांत पाटील हे या निवडणुकीत सक्रिय राहिले आहेत.

