Hasan Mushrif On FRP : ‘एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच’ | पुढारी

Hasan Mushrif On FRP : 'एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच'

माद्याळ : पुढारी वृत्तसेवा

काळम्मा बेलेवाडी येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी 2,960 रु. देण्यात येणार आहे. कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री व कारखाना संस्थापक हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे होते. (Hasan Mushrif On FRP)

मंत्री मुश्रीफ म्हणाले, एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळे कोणीही टिमकी वाजवण्याची गरज नाही. येत्या एक-दोन वर्षातच घोरपडे कारखान्याची गाळप क्षमता 10 हजार टन, 50 मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज 1 लाख लिटर इथेनॉल निर्मिती अशी विस्तारवाढ करणार आहे.

Hasan Mushrif On FRP : साखर कारखाना भाड्याने घ्या, तो आदर्शवत चालवा

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या आठवड्यातच शेतकरी संघटनेचे नेते प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक तसेच इतर प्रमुख मंडळी मला भेटली. मी त्यांना म्हणालो होतो, कोणीही व्यक्तिगत घेऊ नका; परंतु एक कर्ज नसलेला साखर कारखाना भाड्याने घ्या, तो आदर्शवत चालवा. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही साखर कारखानदारी चालवू.

स्वागतपर भाषणात अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी कारखान्याच्या गेल्या सहा हंगामांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने यांचेही भाषण झाले. कारखान्याचे कर्मचारी संजय मारुती पाटील (रा. भडगाव) यांनी एक महिन्याचा पगार मंत्री मुश्रीफ यांच्या दाव्याच्या खर्चासाठी दिला.

कार्यक्रमास जि. प. सदस्य युवराज पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, जगदीश पाटील, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे, पं. स. सदस्य जयदीप पोवार, डी. एम. चौगुले, निलेश शिंदे, रवी परीट, नेताजी मोरे, दिनकरराव कोतेकर, रणजीत सूर्यवंशी, प्रा. डी. डी चौगुले, बाळासाहेब तुरंबे, शिरीष देसाई, मारुतराव घोरपडे, नारायण पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी आभार मानले.

संजय घाटगे यांना उतारवयातही त्रास

‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, जिल्ह्यात सगळेच कारखाने एकरकमी एफआरपी देत आहेत. मग, शाहू कारखान्याने एकरकमी एफआरपी दिल्याचा एवढा डांगोरा पिटण्याची काय गरज? माजी आ. संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला शेतकर्‍यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून ऊस तिकडे जातोय या भीतीने हा गवगवा समरजित घाटगे करीत आहेत.

अशा पद्धतीने संजय घाटगे यांना उतारवयातही ते त्रास देत आहेत. समरजित घाटगे यांचे शेतकर्‍यांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते, असा सवालही त्यांनी केला.

Back to top button