स्वाभिमानी लोकसभेच्या पाच जागा लढविणार : राजू शेट्टी | पुढारी

स्वाभिमानी लोकसभेच्या पाच जागा लढविणार : राजू शेट्टी

सरुड; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढविणार आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने तयारीला लागावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. आंबा (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्यातील हातकणंगलेसह लोकसभेच्या अन्य कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या निमित्ताने शेट्टींनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या वाटचालीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून आम्ही केंव्हाच बाहेर पडलो आहेत. तर भाजपच्या आघाडीमधूनही या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सातत्याने संघर्ष चालू आहे. यात रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. तरीही लोकांची मुंडी पिरगाळून तुम्हाला फार काळ राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगण्याची गरज आहे. मी संसदेत मांडलेला हमीभावाचा कायदा अजूनही प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचाही संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे. म्हणून स्वाभिमानी स्वबळावर लोकसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार आहे.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित पवार, संदीप राजोबा, सचिन शिंदे, वसंत पाटील, अमोल महाजन आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

   हेही वाचलंत का ?

Back to top button