कोल्हापूर : कसबा तारळेत सर्व गटनेत्यांची प्रतिष्ठा पणाला! प्रत्येकाने घेतलीय घरातच उमेदवारी
गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील बाजारपेठेचे एक प्रमुख गाव असलेल्या कसबा तारळे ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. गावातील जवळपास सर्व प्रमुख गटनेत्यांनी आप- आपल्या घरात ग्रामपंचायतीची उमेदवारी घेतल्याने या गटनेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता यापैकी कोणा-कोणाची घराणेशाही ग्रामस्थ स्वीकारणार? हे मंगळवारी निकालानंतरच स्पष्ट होईल.
शेकापचे ज्येष्ठ नेते माजी उपसभापती दत्तात्रय हणमंत पाटील यांनी आपले सुपुत्र पंकज यांना रिंगणात उतरविले आहे. भोगावतीचे माजी संचालक दत्ता हरी पाटील यांच्या स्नुषा सौ. विमल या थेट सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. सौ पाटील यांचे पती रवींद्र पाटील भोगावतीचे विद्यमान संचालक आहेत. भोगावतीचे माजी संचालक दत्ता धोंडी पाटील यांच्या ही स्नुषा सौ. पूनम या ग्रामपंचायतीच्या उमेदवार आहेत. भोगावतीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक संजयसिंह पाटील यांनी आपले सुपुत्र स्वरूप पाटील यांना ग्रामपंचायत उमेदवारी दिली आहे. शेकापचेनेते सुभाष पाटील यांनी आपल्या भावजय सौ. साधना पाटील यांना ग्रामपंचायतीची उमेदवारी दिली आहे. भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील यांचा अपवाद वगळता गावातील सर्वच गटनेत्यांनी आप- आपल्या घरात ग्रामपंचायतीच्या उमेदवारी घेतल्या असून, आता मंगळवारच्या निकालानंतर त्यांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
- बीड : गेवराई तालुक्यात आज ग्रामपंचायतीची रणधुमाळी!; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
- सांगली : वाळवा तालुक्यात पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत
- कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 3 हजारांवर पोलिस रस्त्यावर