नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश; पथक चिपळूणकडे | पुढारी

नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश; पथक चिपळूणकडे

नाशिक; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्र्यांबात द्वेषभाव, बदनामी निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी अटक करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूनकडे गेल्याचेही समजते. नाशिक पोलिस आयुक्तांनी याबाबत आदेश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नारायण राणे यांच्यावर तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून अटक करताना प्रोटोकॉल पाळण्याचे पोलिस पथकाला सूचना करण्यात आली आहे.

‘किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे,’अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली हाोती.

मात्र, ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक होत असून आज आंदोलन करण्याची शक्यता आहे.

नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे वाक् युद्ध अधिकच भडकत असल्याचे दिसत आहे. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा महाडला आहे. तेथे पत्रकारांशी बोलताना ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती,’असे वादग्रस्त वक्तव्य केले.

राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका असून लहान मुलांना याचा अधिक धोका आहे, म्हणून गर्दी टाळावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याबाबत पत्रकाराने राणे यांना प्रश्न विचारताच राणे चांगलेच भडकले.

राणे म्हणाले ,‘त्यांनाच काही कळत नाही, ते आम्हाला काय सांगणार. ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा आवाज त्यांना कुठून आला? आणि ती सुद्धा लहान मुलांना धोका आहे म्हणायचे आणि लोकांना घाबरवायचे. अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे.

त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल म्हणाव. त्या दिवशी नाही का ते बडबडले. स्वातंत्र्य दिन कितवा आहे हेही त्याला माहीत नाही.’

हे सरकार कोण चालवत आहे? या सरकारला ड्रायव्हरच नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता उपभोगत आहे, अशी टीका केली.

शिवसेना आक्रमक

नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत चांगलेच भडकले.

स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.

केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडून गेले आहे. पण एक लक्षात ठेवावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटण्याची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे.

राणे यांची वकिलांशी चर्चा…

दरम्यान, अटक होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून नारायण राणे यांनी याबाबत वकिलांबरोबर चर्चा केली असल्याचे समजते.

Back to top button