कोल्हापूर : स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर आमदार आवाडेंच्या साखर कारखान्याकडून ‘तो’ निर्णय मागे | पुढारी

कोल्हापूर : स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर आमदार आवाडेंच्या साखर कारखान्याकडून 'तो' निर्णय मागे

हुपरी ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून महावितरणला वापरलेल्या विजेची रक्कम कपात केली आहे. ही रक्कम कपात करू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. कारखाना प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत कपात केलेली २०३ शेतकऱ्यांची ६ लाख ७१ हजार २८५ इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करण्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखान्यांकडून शेती पंपाच्या थकीत वीज बिलांची तसेच पाटबंधाऱ्यांच्या थकीत पाणी पट्टीची वसुली सुरू केली आहे. याला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सावकर मादनाईक, सागर शंभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२९) कारखान्यावर आंदोलन करण्यात आले.

दरम्यान आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनास धारेवर धरले. यावेळी कारखाना प्रशासनाने शेतकरी सभासदांची संमती असेल तरच ही रक्कम वीज मंडळाला वर्ग होईल अन्यथा नाही असे सांगण्यात आले. मात्र ही रक्कम कपात करायची नाही, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला.

त्यानंतर कारखान्याचे कार्यकरी संचालक मनोहर जोशी यांनी कपात केलेली २०३ शेतकऱ्यांची ६ लाख ७१ हजार २८५ इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत असल्याचे पत्र दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

कोल्हापूर : जवाहरचा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठीच : आमदार आवाडे

दरम्यान , जवाहरचे संचालक व आमदार प्रकाश आवाडे यानी याबाबत  जवाहर कारखान्याची भूमिका एका निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की ,राज्य शासनाने महाराष्ट्र वीज मंडळाच्या माध्यमातून ज्या सभासद शेतकऱ्यांची थकबाकी आहे ती मिळवून देण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यानुसार कारखान्याच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डाने निर्णय घेतला आहे.

परंतु शेतकरी संघटनाची काही मंडळी राजकीय द्वेषातून जवाहर कारखाना जबरदस्तीने सभासद शेतकऱ्यांची रक्कम कपात करत असल्याचा अफवा पसरवत आहेत. मात्र कारखान्याने तीन ते पाच हजार रुपये पर्यंतच्याच रकमा कपात करून कारखान्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जो शेतकरी माझी काहीही थकबाकी नाही असा अर्ज करेल त्याची रक्कम त्याला परत दिली जाईल. शिवाय जे शेतकरी थकबाकी रक्कम कपात करण्यास संमती देईल त्याचीच रक्कम कपात केली जाईल.

अन्यथा ती रक्कम शेतकऱ्यास परत दिली जाईल.परंतु काही मंडळी माहिती न घेता वेगळाच विषय करत आहेत. शेतकऱ्याचे हित कसे जोपासायचे हे जवाहर ला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी कारखाना जन्माला घातला आहे. शेतकरी हिताचे अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी प्रयत्न करा, आम्ही तुमच्यासोबत येऊ. पण राजकीय द्वेषातून जवाहर कारखान्याची बदनामी करू नका. शिवाय शेतकरी सभासदांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.असे आवाहन त्यानी केले आहे.

Back to top button