रत्नागिरी स्थानकावर ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे जल्लोषात स्वागत | पुढारी

रत्नागिरी स्थानकावर 'वंदे भारत एक्सप्रेस'चे जल्लोषात स्वागत

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून (दि.२७) कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली. मडगाव – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी रत्नागिरी स्थानकावर दाखल झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे रत्नागिरीकरांनी जल्लोषात स्वागत केले.

यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते.

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. विशेष निमंत्रितांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरील पहिली वंदे भारत एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी दाखल झाली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या उच्च तंत्रज्ञानयुक्त या हायटेक ट्रेनच्या स्वागतासाठी रत्नागिरीकरांनी स्थानकावर गर्दी केली होती. ढोल ताशाच्या गजरात, फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले.

यावेळी गाडीचे लोको पायलट ए. के. कश्यप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गाडी पाहण्यासाठी उपस्थित अनेक नागरिकांनी वंदे भारत एक्सप्रेससह सेल्फी काढली.

हेही वाचा 

Back to top button