HSC Exam : राज्यात पुन्हा कोकण बोर्ड अव्वल; सलग ११ वर्षे प्रथम | पुढारी

HSC Exam : राज्यात पुन्हा कोकण बोर्ड अव्वल; सलग ११ वर्षे प्रथम

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उच्च माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.२५) जाहीर झाला. यामध्ये दरवर्षी प्रमाणे कोकण बोर्ड राज्यात अव्वल ठरलं आहे. सलग 11 वर्षे कोकण बोर्ड राज्यात प्रथम आलं आहे. कोकण बोर्डाचा 96.1 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेला बसलेले 26 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 24 हजार 990 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा 2.81 टक्के अधिक आहे. (HSC Exam)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत पार पडली होती. त्याचा निकाल गुरूवारी दु. 2 वाजता जाहीर करण्यात आला. कोकण बोर्डात 256 कनिष्ठ महाविद्यालय असून एकूण 61 परीक्षा केंद्रात ही परीक्षा पार पडली. यामध्ये रत्नागिरीतील 17 हजार 69 विद्यार्थी तर सिंधुदुर्गतून 8 हजार 959 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी रत्नागिरीतील 16 हजार 254 तर सिंधुदुर्गतील 8 हजार 736 विद्यार्थी असे एकूण 24 हजार 990 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 96.1 टक्के निकाल लागला आहे. तर पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी 298 बसले होते. 195 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 125 तर सिंधुदुर्गतील 50 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (HSC Exam)

शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे…

रत्नागिरी जिल्ह्यात विज्ञान शाखेचा 95 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये 5 हजार 688 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 5 हजार 429 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. यामध्ये 4 हजार 429 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.32 टक्के लागला आहे. या शाखेतून 6 हजार 504 विद्यार्थ्यांपैकी 6 हजार 330 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच व्यावसायिकचा 97.31 टक्के निकाल लागला. 372 पैकी 362 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टेक्निकल सायन्स 96.5 टक्के निकाल लागला. 76 पैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या परीक्षेला 13 हजार 22 मुलगे बसले होते. त्यापैकी 12 हजार 320 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 94.60 टक्के आहे. तर 13 हजार 6 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 12 हजार 670 उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 97.41 टक्के आहे. तुलनात्मक स्थिती बघता मुलींच्या उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा 2.81 टक्के अधिक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून 8 हजार 484 मुलग्यांपैकी 7 हजार 935 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 93.52 टक्के आहे. तर 8 हजार 585 मुलींपैकी 8 हजार 319 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण 96.90 टक्के आहे. गतवर्षीच्या निकालाची तुलना केली तर यावर्षी 1.20 टक्के घट झाली आहे. गतवर्षी 97.21 टक्के निकाल होता. यावर्षी मात्र 96.1 टक्के निकाल लागला आहे.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी 26 मे ते 5 जून पर्यंत तर छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयामार्फत गुणपत्रिका वितरण 5 जून पासून वितरीत केले जाणार आहे.

राज्याचा निकाल

या परीक्षेत कोकण विभाग अव्वल ठरला असून त्यानंतर पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल लागला आहे. नागपूरचा 90.35 टक्के, औरंगाबाद 91.85 टक्के, मुंबई 88.13 टक्के, कोल्हापूर 93.28 टक्के, अमरावती 92.75 टक्के, नाशिक 91.66 टक्के, लातूर 90.37 टक्के असा निकाल लागला आहे.

हेही वाचा;

Back to top button