रत्नागिरी : शेतजमिनीच्या वादातून तरुणीचा खून; राजापूर तालुक्यातील घटना | पुढारी

रत्नागिरी : शेतजमिनीच्या वादातून तरुणीचा खून; राजापूर तालुक्यातील घटना

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील भालवली येथे शेतजमीवादातून तरुणीचा खून केल्याची घटना घडली. साक्षी मुकूंद गुरव (वय २१, रा. भालवली वरची गुरववाडी) असे तिचे नाव आहे. तर सिध्दी संजय गुरव (वय 22, रा. भालवली वरची गुरववाडी) ही जखमी झाली. ही घटना आज (दि. १८) दुपारी घडली. याप्रकरणी संशयित आरोपी विनायक शंकर गुरव (वय ५५, रा. वरची गुरववाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार. गुरववाडी येथील सिध्दी आणि साक्षी या भालावली सिनियर कॉलेज, धारतळे येथे शिकतात. आज अकारा वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर त्या दोघी नेहमीच्या रस्‍त्‍याने घरी निघाल्या. वाटेवर संशयीत आरोपी विनायक गुरव हा त्यांची वाट पाहत थांबला होता. त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर काठीने हल्ला केला. सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे गेली. त्यानंतर त्याने तिलाही काठीने मारहाण केली आणि तिचा गळा आवळला. सिद्धीने  मोबाईल फोनवरून घरी या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत विनायक घटनास्‍थळावरुन पसार झाला.

हल्ल्याची माहिती मिळताच साक्षी आणि सिद्धीच्या कुटुंबीयांनी नाटे पोलिसांना माहिती दिली आणि घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात साक्षीचा जागीच मृत्यू झाला.  सिद्धी गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी नाटे सागरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी विनायकचा पाठलाग करून त्याला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

हेही वाचा : 

Back to top button