![इंदिरा गांधी मदर ऑफ इंडिया; काँग्रेस नेत्यांबद्दल भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे गौरवोद्गार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-1-186.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील भाजपचे एकमेव खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपींकडून काँग्रेस नेत्यांबद्दल गौरवोद्गार काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 'मदर ऑफ इंडिया' आणि काँग्रेस नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे 'धैर्यवान प्रशासक' असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच करुणाकरन आणि मार्क्सवादी नेते ई.के. नयनार यांना 'राजकीय गुरू' म्हटले आहे. पंकुनम येथील करुणाकरन यांच्या 'मुरली मंदिरम' या स्मारकाला भेट दिल्यानंतर गोपी पत्रकारांशी बोलत होते.
सुरेश गोपी के. करुणाकरन यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते के. मुरलीधरन यांच्या विरोधात त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्रिशूर जागेवरील तिरंगी लढतीत मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. करुणाकरन यांच्या स्मारकाच्या भेटीचा राजकीय संबंध जोडू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी येथे आलो असल्याचे गोपी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नायनार आणि त्यांची पत्नी शारदा हे शिक्षकांसारखे आहेत. करुणाकरन आणि त्यांची पत्नी कल्याणीकुट्टी अम्मा यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. १२ जून रोजी कन्नूर येथील ई.के. नयनार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. इंदिरा गांधींना 'भारतथिंते माथावू' (भारतमाता) आणि के. करुणाकरन यांना 'केरळमधील काँग्रेस पक्षाचे जनक' मानले जाते. करुणाकरन यांना केरळमधील काँग्रेसचे जनक म्हणणे म्हणजे दक्षिणेकडील राज्यातील सर्वात जुन्या पक्षाच्या संस्थापकांचा किंवा सहसंस्थापकांचा अनादर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :