श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : बेलवंडी शिवारातील चिंभळे रोडवरील गुरुदेव बेकरीच्या कार्यालयाचे शटर तोडून तीन चोरट्यांनी साडे सहा लाखांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. महिन्याभरात 15 घरे, दुकाने पतसंस्थांमध्ये घरफोड्या झाल्याने बेलवंडीकर संतप्त झाले आहेत. बेलवंडी पोलिसांची निष्क्रियताच या चोर्यांना अनुकूल असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या महिना भरात 14 चोर्या झाल्या. या चोर्यांचा तपास लागला नाही, म्हणून बेलवंडीकरांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावर बेलवंडी पोलिसांनी गावची सुरक्षा व्यवस्था वाढविली. मात्र चोरट्यांनी गणेश बेल्हेकर यांची मळ्यातील बेकरी फोडली आहे.
चोरट्यांनी दीड वाजण्याच्या सुमारास बेकरीच्या कार्यालयात प्रवेश केला. सुमारे 41 मिनिटे चोरी केली कपाटातून चोरलेले पैसेही घटनास्थळीच वाटून घेतल्याचे दिसत आहे. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
पोलिस उपनिरीक्षक विजय बोत्रे, राजेंद्र चाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. सकाळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या पथकाने भेट दिली. अण्णासाहेब शेलार, उत्तम डाके, सोपान हिरवे यांनी भेट देऊन बेलवंडीतील चोर्यांचा छडा कधी लावणार? असा सवाल केला. गावात ज्या चोरांनी चोर्या केल्या त्याच चोरांनी गुरुदेव बेकरीतील रोकडीवर डल्ला मारला, हे सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रफितीवरून स्पष्ट होते.
बेलवंडी पोलिसांची निष्क्रियताच या चोर्यांना कारणीभूत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी या चोर्यांचा तपास लावण्यात आग्रही भूमिका घ्यावी. जाधव या चोर्यांचा तपासात लक्ष घालून चोर गजाआड करतील का?
बेलवंडी पोलिस कार्यरत आहेत की नाहीत, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. चोर्यांचे अनेक प्रकार होऊनही, चोरांचे सीसीटीव्ही फूटेज हाती असतानाही चोर का सापडत नाहीत. इतक्या दिवसात हे आरोपी पोलिसांना का सापडले नाहीत की पोलिसांनी तपासच केला नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
बेलवंडीत घरे, दुकाने फोडणारे चोरटे निष्पन्न झाले आहेत. फक्त त्यांना पकडणे बाकी आहे. दोन-तीन दिवसांत त्यांना गजाआड केले जाईल. ग्रामस्थांनी थोडेसे सहकार्य करावे.
– अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक