नगर : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी सरकार पडता पडेना म्हणून वेगवेगळ्या कुप्त्या लढविल्या जात आहेत. भोंग्याचा वाद उभा करून जातीय तेड निर्माण करण्याचा डाव होता, पण समाज आता शहाणा झाला आहे. मुंबई, पुणे, नगर, औरंगाबाद येथे काहीच घडले नाही. यात राज ठाकरे यांचा गेम झाला हे त्यांनाच कळले नाही, असे निरीक्षण प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांनी नोंदविले. नगर येथे कार्यक्रमानिमित्त आलेले शाहीर संभाजी भगत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सामाजिक काम करीत असताना काहीकाळ संविधानाचा प्रचार करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधन केले. समाजातील मूलतत्वे, वैचारिकता, मानवीमूल्य, तत्त्वज्ञान नष्ट झाली आहे. त्यासाठी मोठे काम उभारावे लागले. प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे यासाठी माणुसकीची शाळा ही चळवळ उभी केली. या चळवळीत कोणी अध्यक्ष नाही प्रत्येकजण कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. दहा वर्षेकाम केल्यानंतर चांगले कार्यकर्ते तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ती मढी उकरू नका मशिद व मंदिराच्या प्रश्नबाबात ते म्हणाले, ही मढी उकरून काढून नका. भविष्याकडे पाहून काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. वर्तमानकाळाकडे पाहून आपण जगले पाहिजे. या गोष्टीत हिंदुत्ववाद्यांना राजकारण करायचे आहे. हे सगळ उकरून काढण्यापेक्षा आपण शाळा, दवाखाने बांधणे गरजेचे आहे. धर्म कोणताही असो त्यातील कालबाह्य गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत.
केंद्रातील सरकारला विरोध करण्यासाठी विरोधात मोठी ताकद नाही. विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाला नेता नाही. तर, प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व राज्यापुरते सिमीत आहे. त्यांना धर्मराष्ट्र उभे कराचे आहे. गांधीजींचा खून करून ते जेलमध्ये गेले. ते संविधान कधीही हुसकून देतील, असेही मत भगत यांनी नोंदविले.
हिंदू राष्ट्र बनविण्याचा अजेंडा घेऊन 1925 पासून ती मंडळी कार्यरत आहेत. त्यांनी 90 वर्षे काम केले तेव्हा त्यांना आता सत्ता मिळाली. ते त्यांचा अजेंडा राबविणार आहेत. त्यांचे उपकार मानावे लागतील कारण त्यांनी अजूनतरी गॅस चेंबरमध्ये माणसे टाकली नाहीत. ही परिस्थिती बदल्याण्यासाठी पुरोगामी लोकांना 90 वर्षे काम करावे लागणार आहे, असे भगत म्हणाले.