रत्नागिरी : दोन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाच्या संकेतस्थळावर येत्या दोन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाठ फिरविलेला पूर्व मोसमीचा मार्ग मोकळा होणार आहे. पुढील पाच दिवसांत कोकण आणि गोवा राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागराच्या काही भागात लवकरच मान्सून सक्रिय झाल्यानंतर त्याची वाटचाल जलद आणि विनाअडथळा सुरू होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच अडकून पडला आहे. आता वातावरण परिस्थिती पोषक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहेे.
बंगालच्या उपसागराच्या काही भागात लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.