नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात शनिवारी तिसर्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 30.5 मिलीमीटर पाऊस झाला. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत.
जिल्ह्यात गुरूवारी सकाळपासून पावसात प्रारंभ झाला. नगर शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पावसाने अकोले वगळता जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शनिवारी तिसर्या दिवशीही दमदार पाऊस झाला. नगर शहरात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वच रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहनचालकांना त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती.
राहुरी, संगमनेर, अकोले, अकोले, नगर व पाथर्डी तालुक्यांत देखील जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या दमदार पावसाने दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी 299.2 मिलिमीटर झाली आहे. एकूण 66.8 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. गणोशोत्सवात पावसाचे आगमन होईल, अशी अपेक्षा होती. उत्तरा नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.
शुक्रवारचा पाऊस पाऊस मिलीमीटरमध्ये असा – नगर 28.9, पारनेर 56, श्रीगोंदा 19.7, कर्जत 6.5, जामखेड 9.4, शेवगाव 11.3, पाथर्डी 25.8, नेवासा 27.9, राहुरी 53.2, संगमनेर 44.7, अकोले 38.7, कोपरगाव 27.4, श्रीरामपूर 22,राहाता 29.5.
जिल्ह्यातील पारनेर 65.8 मिलीमीटर, सुपा 109.3 मिलीमीटर, पळशी 98.3 मिलीमीटर, देवळाली 66.5 मिलीमीटर, धांदरफळ 65.3 मिलीमीटर, साकूर 83.3 मिलीमीटर. सात्रळ 82.8 मिलीमीटर.
हेही वाचा