कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्व समाजाचे व विविध जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहत आहेत. हाच जातीय सलोखा आपल्याला यापुढे देखील टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होणार नाही, काळजी घ्यावी, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहर पोलिस ठाणेमध्ये पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. काळे बोलत होते.या बैठकीसाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, ग्रामीण पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलिस उपनिरीक्षक महेश येसेकर, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, असिस्टंट पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, माजी आ.स्नेहलता कोल्हे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाघचौरे,शैलेश साबळे, दिनकर खरे, इम्तियाज अत्तार, रमेश गवळी आदी उपस्थित होते.
आ. काळे पुढे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहर व तालुक्यात घडलेल्या काही घटनांमुळे सर्व जाती धर्माच्या नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आपल्या तालुक्याची शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे.
त्याचबरोबर ज्या व्यक्तीमुळे समाजात समाजात जाती धर्मावरून तेढ निर्माण होवून कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होत असेल तर असे दुष्कृत्य करणारा व्यक्ती कोणत्याही समाजाचा असला तरी अशा समाज कंटकाविरुद्ध कडक कारवाई झालीच पाहिजे. कोळगाव थडी येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली.
समाजातील कोणत्याही जाती धर्माची माय-बहीण सुरक्षित राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकत्र येवून समाजा-समाजात तेढ निर्माण होणार नाही व कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होणार नाही, यासाठी प्रयत्न करून जातीय सलोखा व एकोपा टिकवून ठेवावा, असे आवाहन आ. काळे यांनी केले.
हेही वाचा