मंत्री विखे व माजी मंत्र्यांची राजकीय मिलीभगत : भानुदास मुरकुटे

मंत्री विखे व माजी मंत्र्यांची राजकीय मिलीभगत : भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  मंत्री विखे व आ.थोरात यांची छुपी युती आहे. ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात आणि इतरांवर अन्याय करतात. ज्या थोरातांनी मंत्री असताना सन 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे विधेयक विधानपरिषदेत मांडले तेच आता दिशाभूल करीत आहेत, असा आरोप करीत, भंडारदर्‍याची पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील. त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे. भंडारदर्‍याचे पाणी आधी निळवंडेत येते. त्यामुळे या पाण्याचा अकोले व संगमनेर भागात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वांना जागरूक रहावे लागेल.

गणेश कारखान्याप्रमाणेच प्रवरा व संगनमेर कारखान्याने 'अशोक' च्या कार्यक्षेत्रातून ऊस नेवू नये, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले. अशोक कारखान्याची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होऊन पार पडली. त्यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरुन मुरकुटे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, इंदूताई डावखर, ज्ञानदेव साळुंके, मंजुश्री मुरकुटे, सुनिता गायकवाड, शालिनी कोलते, हनुमंतराव वाकचौरे, हिम्मतराव धुमाळ, सचिन गुजर, अ‍ॅड. सुभाष चौधरी, सुधीर नवले, बापुराव त्रिभुवन, काशिनाथ गोराणे, बाबासाहेब ढोकचौळे, भाऊसाहेब उंडे, दत्तात्रय नाईक, रामदास पटारे, भाऊसाहेब हाळनोर, सखाराम कांगुणे आदी उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले की, निळवंडेच्या पाण्याचा अकोले, संगमनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यातील काही गावांना फायदा होईल.

संबंधित बातम्या :

श्रीरामपूर व नेवासा तालुक्याला आणि उर्वरित राहुरी तालुक्याला काहीच लाभ व फायदा नाही. पुढच्या पिढ्यांच्या हितरक्षणासाठी पाटपाण्याबाबत दक्ष राहावे लागेल. सभासदांचा आपल्यावर विश्वास असल्याने 35 वर्षे आमच्याकडे कारखान्याची सूत्रे दिलेली आहे. आम्हीही 100कोटींचा इथेनॉल प्रकल्प, 100 कोटींचा डिस्टीलरी प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प यासह पॉलिटेक्निक,डी, फार्मसी व महाविद्यालय, आय.टी.आय. व दोन स्कूल्स असे शिक्षण संकूल उभे केले. त्याबद्दल आरोप करणारे शब्दभरही बोलत नाहीत.
शासनाने शेतकर्‍यांना कबूल केलेले विविध अनुदाने अद्यापही दिले नाही. तसेच पाणी पट्टीतही तब्बल तीन पटीने वाढ केली आहे. यासंदर्भातही शेतकर्‍यांचे नेते अवाक्षरही काढीत नाही. 'अशोक' वर टीका करणारे, आंदोलने करणार्‍यांमध्ये इतर कारखान्यांंवर जाऊन आंदोलन करण्याची हिम्मत नाही, असे मुरकुटे यांनी खडसावले.

वंदना मुरकुटे म्हणाल्या की, आपला कारखाना संगमनेर कारखान्याइतका भाव का देवू शकत नाही. चांगला साखर उतारा मिळाला असताना उसाला भाव मिळत नाही. मागील वर्षीच डिस्टीलरी सुरु करणार होतो, तसे झाले नाही, असे मुद्दे मांडले.
शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे यांनी सभासदांना एक लाखाच विमा दिला जातो, तो सभासदांचा अपघाती मृत्यु झाल्यास 10 लाखाचा करावा. ऊस भाव वाढवून मिळावा व दिवाळी गोड करावी, अशी मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले म्हणाले की, इतर कारखान्यांच्या तुलनेत उत्पादन खर्च जास्त आहे. बाहेरच्या कारखान्यांकडे कोट्यावधींची देणी असताना आर.सी.सी. कारवाई का केली नाही, अशी विचारणा केली. वरच्या भागात आता निळवंडेचे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे भंडादर्‍याचे संपूर्ण पाणी ओझर खालील भागाला मिळावे. तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करावा, असे दोन ठराव त्यांनी मांडले. यावेळी रणजीत बनकर, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी आपले मुद्दे मांडले. यावेळी सभेचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप खंडागळे यांनी केले व विरेश गलांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेस सभासद, संचालक मंडळ उपस्थित होते.

उसाला जादा भाव दिल्याबद्दल कौतुक नाही
जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे उपपदार्थ, वीजनिर्मिती प्रकल्प असताना कमी भाव देतात. त्यासंदर्भात जाणिवपूर्वक माहिती दिली जात नाही. वृध्देश्वर (रु.2,500), मुळा (रु.2,450), प्रवरा (रु.2,344), ज्ञानेश्वर (रु.2,400) तर अशोक रुपये 2,573 असा भाव दिला. त्याबद्दल कौतुक नाही. अनेक कारखाने बाहेरुन ऊस आणतात. त्यांना वेगळा व कमी भाव देतात. आपण असा दुजाभाव करीत नाही. याबाबत बोलण्याची दानत टीका करणारे दाखवित नाहीत. असे माजी आ. मुरकुटे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news