जामखेडकरांची वाट चिखलातून..! होणार्या त्रासाची रोहित पवारांनी घेतली दखल
जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जामखेड ते सौताडा हा राष्ट्रीय महामार्ग जामखेड शहरातून जातो, सध्या या महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु, या कामाचा दर्जा चांगला नसल्याने अन् पावसात रस्त्यावर चिखल साचून नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र पाठविले आहे. त्यांचे या कामाकडे लक्ष वेधले आहे.
जामखेड ते सौताडा या 13 किमी अंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून, त्यासाठी आमदार रोहित पवारांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. परंतु, सध्या काही प्रमाणात पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब आमदार पवारांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नतीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्रही पाठविले आहे.
खराब अन् काम निकृष्ट दर्जाचे काम होऊ देणार नाही : पवार
सरकारकडून येणारा निधी हा योग्य पद्धतीने वापरला जाणे हे महत्त्वाचे असते. पिण्याच्या पाण्याच्या लाईन व रस्ते असतील, अशा विविध कामांकडे वैयक्तीक लक्ष घालतो. आणि जेव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेकवेळा नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या, त्यावेळी स्वत: पाहणी केली आणि मंत्री व अधिकार्यांना याबाबत सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. कोणत्याही परिस्थितीत खराब आणि निकृष्ट दर्जाचे काम मतदारसंघात होऊ देणार नाही, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
आमदार पवारांनी पत्रता म्हंटलं की..!
आमदार पवारांनी पत्र म्हंटले की, नागरिकांना होत असलेला त्रास आणि पावसामुळे चिखल साचून, तसेच सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची होत असलेली दैना मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. तसेच, वेळोवेळी ठेकेदारांना सांगून आणि याबाबत चर्चा करूनही शेवटी परिस्थिती 'जैसे थे'च असल्याचे पाहायला मिळते. ही बाबही रोहित पवारांनी पत्रात नमूद केले आहे. आता, दर्जेदार आणि उत्तम पद्धतीचे काम होण्यासाठी संबंधितांना निर्देशित करावे, हा बहुप्रतीक्षित महामार्ग जामखेड शहरातून जातो, त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल याकडे लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हेही वाचा

