आता आमदार, खासदारांचीही माहिती हवी!

आता आमदार, खासदारांचीही माहिती हवी!
Published on
Updated on

नगर;  पुढारी वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी समर्पित आयोगाचे काम सुरु झाले आहे. गेल्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची माहिती आयोगाला उपलब्ध झाली आहे. आयोगाने आता संसद व विधिमंडळावर आतापर्यंत निवडून गेलेल्या आमदार व खासदारांची माहिती मागविली आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे.

महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 1994 पासून ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर ओबीसी प्रवर्गातील नागरिक निवडून आले.

त्यामुळे अनेकांना नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समित्यांचे सभापती होण्याचा मान मिळाला. परंतु, मध्यंतरी काहींना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करावे, अशी मागणी केली. त्यानुसार ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रदृ करण्यात आले. आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजाबरोबरच विविध राजकीय पक्षांत खळबळ उडाली. त्यामुळे राज्य सरकारने हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी समर्पित आयोगाची नियुक्ती केली आहे.

आयोगाच्या वतीने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी 1960 ते 1994 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती ओबीसी, व्हीजेएनटी, अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील किती जण निवडून आले आहेत. याची माहिती मागविली होती.

जिल्हा प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे या विविध संस्थांचे इतिवृत्त व इतर माहितीद्वारे ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची माहिती उपलब्ध केली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतीच उपलब्ध माहिती आयोगाकडे पाठविली आहे.

आयोगाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पोहोचत नाही तोच समर्पित आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषदेची माहिती मागवली आहे. संसदेवर व विधिमंडळावर मागासवर्गीय व्यक्तींबरोबरच इतर प्रवर्गातील कोणकोण निवडून गेले आहेत याची माहिती जातप्रवर्गासह मागितली आहे. त्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी यांची माहिती गोळा करण्यासाठी धावपळ सुरु आहे.

राज्यसभेवर एकच उमेदवार

जिल्ह्यातील बी. सी. कांबळे, भाऊसाहेब वाकचौरे, सदाशिव लोखंडे कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. गोविंदराव आदिक हे राज्यसभेवर एकदा निवडून गेले आहेत. बाबूजी आव्हाड, बबनराव ढाकणे, दगडू बडे व पांडुरंग अभंग हे उमेदवार सर्वसाधारण जागेतून विधानसभेवर निवडून गेले होते. मुस्लिम समाजाचे एस.एम.आय. असीर हे एकमेव उमेदवार विधानसभेवर निवडून गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news