अकोलेः पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांमध्ये निर्दोष मुक्त झालेला सिरीअल किलर मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य याने अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने संतप्त जमावाने त्याला जबर बेदम चोप दिला. उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी रात्री मृत घोषित केले. दरम्यान, अण्णा वैद्यच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पो. नि. विजय करे म्हणाले.
तालुक्यातील सुगाव खुर्द येथील अण्णा वैद्य याने 4 महिलांचा खून करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता. संगमनेर येथील ताराबाई आसाराम राऊत (वय 45 वर्षे) या महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेर न्यायालयाने अण्णा वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणी गावकर्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात
दिल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेप झाली होती. निर्दोष मुक्त झाल्यावर तो सुगाव खुर्द येथे राहत होता. अण्णा वैद्यवर 4 महिलांच्या खुनाचा आरोप होता.
पहिल्या खून खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. नंतर काही महिन्यांत दुसर्या खून खटल्यातून संगमनेर न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली तर तिसर्या खटल्यात त्याला पुन्हा जन्मठेप सुनावली होती. एका महिलेच्या खुनाचा खटला प्रलंबित आहे. अण्णा वैद्यने रविवारी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिला मारहाण केली होती. या मारहाणीत मुलगी जखमी झाली होती.
याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात पोक्सो, अॅट्रोसिटींतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर जमावाने अण्णा वैद्यला जबर मारहाण केल्याने त्याला उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला रात्री मृत घोषित केले.
सोमवारी अण्णा वैद्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी अण्णा वैद्यच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पो. नि. करे म्हणाले.
हेही वाचा