राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पती- पत्नीच्या वादातून सासरच्या लोकांनी जावयाला रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. दांडा व लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात (दि.26 सप्टेंबर) रोजी घडली. मारहाणीत जावई गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशांत इगनाती केदारी (वय 33 वर्षे, रा. गुरुकुल वसाहत, राहुरी फॅक्टरी) यांचे लग्न 2019 मध्ये पल्लवी ऊर्फ प्राची लोखंडे (रा. इंद्रनगर, गल्ली नं. 7, संगमनेर) या तरुणीशी झाले.
घरगुती वादातून सुशांतची पत्नी माहेरी राहत होती. तेव्हा वाद निर्माण होऊन सुशांत यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दिली होती. दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजे दरम्यान सुशांत हे राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा नगर- मनमाड हायवेवरुन जात होते. तेव्हा तेथे त्यांचा सासरा, मेव्हूणा व इतर सहा ते सात लोकांनी येऊन त्यांना अडविले. तु आमच्याविरुद्ध फिर्याद का दाखल केली, असे म्हणत सुशांत यांना शिवीगाळ करुन धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. दांडा व लाथा -बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तू पुन्हा संगमनेर येथे दिसला तर तुला जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली.
या घटनेत सुशांत केदारी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अ.नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पोलिसांसमक्ष दिलेल्या जबाबावरुन आरोपी सासरा शाम मानिक लोखंडे, मेव्हणा यश शाम लोखंडे व इतर 2 ते 5 अशा 7 जणांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा