दुर्दैवी ! पावसाअभावी 4 एकर सोयाबीनवर फिरविला नांगर ; कर्जामुळे खचला तरुण शेतकरी
घारगाव : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील विविध पिके कोमेजली. प्रामुख्याने काही सोयाबीन पिके करपली तर काही जळाली. काही पिकांना शेंगाच लगडल्या नाही. अशी पदरी निराशा पडलेल्या नांदूरखंदरमाळ गावच्या युवा शेतकर्याने हताश होत तब्बल 4 एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवत सोयाबीन पिक नष्ट केले.
नादूरखंदरमाळ गावचे सुरेश भागवत या शेतकर्याने जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर शेतीची मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली. हे पीक सुरुवातीच्या पावसावर डौलदार उतरले. सोयाबीन पिकाला उभारी मिळाल्या नंतर मध्यंतरी दिलासादायक पाऊस झाला. यावर सोयाबीनची खुरपणी करून खते टाकली. कीटक नाशकांची फवारणी केली. मोठ्या काबाडकष्टाने पिकवलेले हे सोयाबीन पीक मोठ्या जोमात होते.
संबंधित बातम्या :
- कारवाईचा सेल्फी काढण्यात पोलीस अधिकारी व्यस्त ; गुन्हेगारी व अवैध व्यवसाय मोकाट
- सांगली : जत तालुक्यावर शोककळा; जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचे निधन
- साहेबांचे जिल्हाध्यक्ष दादांच्या प्रेमात !
संगमनेर तालुक्यात पावसाने डोळे वटारले. विशेषतः पठार भागासह तळेगाव, निमोण येथे दुष्काळाचा वनवा निर्माण झाला आहे. पावसाअभावी खरीप पुर्णतः धोक्यात आला. पाण्याअभावी पेरणी केलेली पिके वाळली आहेत. खरीप हंगामात पिके उभे करण्यास घेतलेले कर्ज कसे फेडायचे. या विवंचनेत शेतकरी वर्ग अडकला आहे. डोळ्यादेखत शेतात वाळलेली पिके पाहून तो हळ-हळत आहे. शासनाने शेतकर्याचा अंत न पाहता दुष्काळात जळणार्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे. शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पठार भागातील शेतकरी करीत आहेत.
नांदूरखंदरमाळ गावचे शेतकरी सुरेश भागवत यांनी शेतकर्याने जून महिन्यात थोड्या-फार पावसावर सोयाबीनची पेरली. यानंतर पुन्हा थोडासा पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर सोयाबीन उगवली. ऐन पिक बहरले. काही दिवसात शेंगा दिसल्या, पण ऐनवेळी दोन- महिन्यांपासून वरूणराजाने पाठ फिरवली. यामुळे शेतकर्याचे होत्याचे नव्हते झाले. पावसाअभावी सोयाबीन करपले. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगा आल्या नाही. काही ठिकाणी जळाली. अशातच लाखो रूपये खर्च करूनही सोयाबीनचे पीक हाती न आल्यामुळे हतबल झालेले शेतकरी सुरेश भागवत यांच्या पदरी निराशा आली. या नैराशेतून 4 एकर सोयाबीनवर थेट नांगर फिरवत सोयाबीन नष्ट केली.
संगमनेरच्या पठार भागात नांदूर खंदरमाळला शेतात सोयाबीन पेरली होती. लाखावर खर्च करून आशेने काबाडकष्ट करून पिक उभे केले. पिक चांगले आले, परंतु पावसाने दडी मारल्याने उभे पीक जळाले. काही हाती लागणार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसले. यामुळे पदरी निराशा आली. उघड्या डोळ्यांसमोर पीक जळाल्याचे पाहवले नाही. काळजावर दगड ठेवून ट्रॅक्टरने 4 एकर पीक नांगरुन नष्ट केले. पावसाअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी.
– सुरेश गो. भागवत, शेतकरी नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर