कर्जत : पीकविम्याच्या 25 टक्के रक्कम आगाऊ मिळणार; आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश
कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाने दांडी मारल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील खरीप पिके वाया गेली असून, शेतकर्यांना पीकविमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के आगाऊ रक्कम शेतकर्यांना मिळणार आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकर्यांना फायदा व्हावा, यासाठी गावागावांमध्ये जाऊन मोफत पीकविमा संरक्षण मिळवून दिले. त्याचाच फायदा शेतकर्यांना होणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकर्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत अधिसूचित महसूल मंडळांमध्ये सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के गट अपेक्षित असावी. त्या अनुषंगाने राज्य शासन, विमा कंपनी आणि शेतकरी प्रतिनिधी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार संयुक्त सर्वेक्षण करतात. त्यांच्या अहवालानुसार नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद त्यात करण्यात आली आहे.
त्यानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला होता. परंतु त्याला मंजुरी मिळत नव्हती. यासाठी आमदार पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी विनंती केली. त्यानुसार या मागणीला आता यश आले. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कर्जत, मिरजगाव, माहिजळगाव, राशीन, भांबोरा व कोंभळी आणि जामखेड तालुक्यातील जामखेड, अरणगाव, खर्डा, नायगाव व नान्नज या महसूल मंडलांचा समावेश प्रस्तावात होता. पिकांची 25 टक्के भरपाई मिळणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
पिकांच्या भरपाईबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. दोन्ही तालुक्यांतील नुकसानीच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांना केली. त्यांनी शेतकरीहिताचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे आभार.
– आमदार रोहित पवार
हेही वाचा
नेवासा : विश्वस्त देशमुख महाराजांची हकालपट्टी करा
गिरीश महाजन यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्टचे प्रकरण चिघळले
Raigad: कर्नाळा अभयारण्यामध्ये बस पलटी, कोणतीही जीवितहानी नाही