हरेगाव मारहाण प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यात निषेध | पुढारी

हरेगाव मारहाण प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यात निषेध

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हरेगावमध्ये दलित समाजातील मुलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ टिळकनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी पिडीत कुटुंबियांना न्याय मिळावा, आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, हरेगाव येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी भेट दिली. संगमनेरमध्ये रास्ता रोकोचे निवेदन देण्यात आले.

टिळकनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच पी. एस. निकम, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब विघे, सरपंच बाळासाहेब ढोकचौळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवि गायकवाड, माजी सरपंच दिलीप त्रिभुवन, कामगार नेते अशोक बोरगे, वंचितचे सुनिल वाघमारे, ग्रा. पं. सदस्य सागर ढोकचौळे, आर. आर. ढोकचौळे, पत्रकार लालमहंमद जहागिरदार, गणेश आवारे, भैय्या पांडे, बाबासाहेब उबाळे, अजय आवारे आदींची भाषणे झाली.

यावेळी कारेगाव सोसायटीचे संचालक अमर ढोकचौळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कटारनवरे, पो. पा. कृष्णा अभंग, नंदु गंगावणे, ग्रा. पं. सदस्य सागर भोसले, निलेश जाधव, कैलास ढोकचौळे, विठ्ठल विघावे, अशोक शेळके, संदीप यादव, प्रभाकर ब्राम्हणे, जाकिर शेख, शकिल पठाण, प्रा.किशोर निळे, दिलीप अभंग, विक्रम बोरगे, संजय वाघमारे, अशोक शेळके, विजय बोरगे, कलिम पठाण, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब हिवाळे, रवि सुतार, विलास अहिरे, गौतम सुतार, रवि बोरगे, अनिकेत गायकवाड, राजु खाजेकर, सागर गुंजेकर यांच्यासह हरेगाव, रांजणखोल, टिळकनगर, दत्तनगरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरसगाव : हरेगाव येथे कबुतरे व शेळी चोरल्याच्या संशयावरून दलित मुलांना झाडाला उलटे टांगून अमानुषपणे बेदम मारहाण झाल्याने श्रीरामपूर तालुक्यासह सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 1 सप्टेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदार आठवले हरेगावात दुपारी येणार असल्याची माहिती रिपाईंचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली. तत्पूर्वी सकाळी ‘वंचित’चे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हरेगाव येथे घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या माणुसकीला कलंक लावणार्‍या प्रकरणाचा निषेध केला.

कायदा हातात घेऊन हरेगावात दलित मुलांना अमानुष मारहाण केली. या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. याप्रकरणी आरोपींना अटक करुन खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी रस्तारोकोमध्ये करण्यात आली होती. रिपाईंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भीमराज बागुल, सुभाष त्रिभुवन आदींनी रिपब्लिकन पक्ष व सर्व पक्षीयांनी हरेगावमधील दलित मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त केला. दि. 30 ऑगस्ट रोजी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल अ. नगर जिल्ह्याचे पदाधिकारी सकाळी 10 वा. हरेगाव येथील पिडितांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत करणार आहेत.

पँथर सेनेचे प्रमुख केदार यांची हरेगावला भेट

हरेगाव येथे झालेल्या मारहाणी प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी श्रीरामपूर येथे कामगार दवाखान्यात पीडितांना तर घटनास्थळी हरेगाव येथे भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. संविधानाचे, आत्मसन्मानाचे महत्व तुम्ही दाखविले. अत्याचाराच्या सर्वात जास्त घटना अ. नगर जिल्ह्यात घडतात. मारहाणकर्त्यांची मालमत्ता शासनाने ताब्यात घेऊन पिडीत कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करावे. त्यांची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून शासकीय सेवेत सामावून घ्यावे. समाजाने अन्यायाविरुद्ध एकजूट कायम ठेवावी. आरोपींना तातडीने कठोर शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी हरेगाव येथे प्रचंड गर्दी झाल्याने काही वेळ रस्ता बंद झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

माजी मंत्री हांडोरे आज हरेगावात

हरेगाव येथील दलित समाजातील तरुणांवर अत्याचारप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी माजी सामाजिक न्याय मंत्री व भीमशक्ती संघटनेचे संस्थापक, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आज 29 ऑगस्ट दुपारी 12 वाजता पीडित कुटुंब व मुलांना भेट देणार आहेत, अशी माहिती भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिली. कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांनी दुपारी 12 वाजता व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे जमावे. पिडित कुटुंबाला भेट देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मगर यांनी केले आहे.

संगमनेरमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा :

आश्वी : हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी संगमनेर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पोलिस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, बुधवार (दि. 30 ऑगस्ट) रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून या – ना – त्या कारणावरुन काही समाजकंटकाकडून दलित समाजावर प्राणघातक हल्ले होत आहेत. समाजकंटकांना त्वरीत शासन झाले पाहिजे. अशी मागणीचे निवेदन संगमनेर रिपब्लिकन पक्ष ( आठवले ) व एकलव्य आदिवाशी संघटनेने दिले.

यावेळी रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, ज्येष्ठ नेते माणिकराव यादव, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोडे, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, एकलव्यचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, मधुकर सोनवणे, रमेश भोसले, प्रकाश वाघमारे, शरद जमदाडे, बाळासाहेब कदम, नानाभाऊ कदम, स्वप्निल कदम, विजय मुन्तोडे, रुपेश राऊत, मेजर भोसले, जनार्दन साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अमानुष मारहाणीची घटना निंदनीय : मुरकुटे

हरेगाव येथील चोरीच्या संशयातून चार मुलांना अमानुषपणे झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना धक्कादायक व निंदनीय आहे. या घटनेचा भारत राष्ट्र समितीच्या वतीने निषेध करतो, असे सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केली. ते म्हणाले, हरेगाव येथे किरकोळ चोरीच्या संशयावरुन चार अनुसुचित जातीच्या मुलांना सहा व्यक्तींनी मारहाण केल्याचे समजले. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा तर्‍हेने मुलांना झाडाला उलटे टांगून मारहाण करणे निंदनीय आहे. आजच्या काळात अशी घटना घडणे हे संतापजनक आहे. सामाजिक असंतोष निर्माण करणारी घटना आहे.

गलांडेसह दोघांना एलसीबीने पकडले

हरेगाव येथील शुभम माघाडे व इतरांना शेळी,कबुतरे चोरीच्या संशयाने युवराज गलांडे व सहकारी यांनी अमानवीय मारहाण केल्याप्रकरणी आणखी दोन आरोपींना पुणे व नाशिक येथून पकडण्यात आले. युवराज नानासाहेब गलांडे व मनोज वसंत बोडखे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने पुणे व नाशिक येथून पकडले. दरम्यान, आरोपींना अटक न केल्यास आज (दि. 28 ऑगस्ट) रोजी श्रीरामपूर बंदचा इशारा देण्यात आला होता. (दि. 27) रोजी हरेगाव फाटा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पीडितांना न्याय मिळाला पाहिजे : करण ससाणे

हरेगाव येथील मुलांना शेळी व कबुतर चोरीच्या संशयावरून झाडाला उलटे टांगून मारहाण करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणारे हे अमानवीय कृत्य केल्याचा निषेध करतो. पिडितांना योग्य न्याय मिळावा. आरोपींना कडक शासन द्यावे, या मागणीचे निवेदन श्रीरामपूर तालुका शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदार मिलिंद वाघ यांना माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, जि. प. माजी सदस्य बाबासाहेब दिघे यांनी दिले. यावेळी दत्तनगरचे उपसरपंच प्रेमचंद कुंकुलोळ, सनी मंडलिक, राहुल कोठारी, युवराज फंड, सुनील साबळे, अजय धाकतोडे, सागर दुपाटी, सुनील शिणगारे, दीपक नवगिरे, गणेश काते, युवराज फंड, सूर्यकांत चाबुकस्वार, अशोकराव जगधने, प्रवीण नवले आदी उपस्थित होते.

हेही वाचा

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोनामुळे रक्ताच्या गुठळीचा वाढतो धोका

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयला कांस्यपदक

उंबरे गावामध्ये कौन बनेगा उपसरपंच..?

Back to top button