कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत- जामखेड मतदारसंघातील जलजीवन योजनेतील दुरूस्तीकरणाची 17 कामे सुरू होणे बाकी आहे. ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन केली. जलजीवनच्या एकूण 170 पैकी 25 कामांत त्रूटी आढळून आल्यानंतर आमदार पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेऊन खराब कामांचे सादरीकरण केले होते. त्यानंतर 4 कामांचे दुरूस्तीकरण झाले. परंतु, अजूनही 21 कामाचे दुरुस्तीकरण होणे बाकी आहे. तसेच, 17 कामे सुरू होणे बाकी आहे. ही कामे मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
जलजीवन मिशन अंतर्गत 170 कामांसाठी 314.07 कोटी रूपये निधी आमदार पवार यांनी मंजूर करून घेतला. त्यापैकी खर्डा गावासाठी 17 कोटी, कोंभळी व इतर 11 गावांसाठी 32.09 कोटी, मिरजगावसाठी 22.85 कोटी, नान्नजसाठी 4.50 कोटी, जवळा गावासाठी 10.82 कोटी असा निधी मिळालेला आहे. तसेच, जामखेड नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 168 कोटी रूपये निधी मंजूर आहे. ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्यावरील वीजबिलाचा ताण कमी होण्यासाठी ग्रामपंचायतीत सोलर पॅनल बसविण्यात आले. परंतु, अजूनही 17 गावे सोलर योजनेपासून वंचित आहेत. त्यांचेही काम लवकरात लवकर सुरू करावे, अशीही मागणी आमदार पवार यांनी केली आहे.
हेही वाचा :