अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; बळीराजा आनंदला
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी 16.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पेरणी झालेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाल्यामुळे शेतकर्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेवगाव, कोपरगाव वगळता उर्वरित बारा तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 57 दिवसांत जिल्ह्यात 36.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला होता.
नगर दक्षिण भागातील सात तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा पावसाने सर्वदूर हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासून जिल्हाभरात पावसाच्या सरी सुरू होत्या. जामखेड, नगर, कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर या तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. नगर शहर आणि तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.
राहुरी, श्रीरामपूर, राहाता, नेवासा, अकोले या तालुक्यांत सरासरी 6 ते 12.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीला पाऊस लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच 97 महसूल मंडलांत पावसाने हजेरी लावली.
कापूरवाडी मंडलात 47.8, नायगाव मंडलात 45.8, खर्डा मंडलात 42.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय 46 महसूल मंडलांत सरासरी 15 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या 57 दिवसांत सरासरी 196.3 मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र, मध्यंतरी पावसाने गुंगारा दिला. त्यामुळे आतापर्यंत 164.9 मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरी 36.8 मि.मी. पाऊस झाला आहे. जामखेड तालुक्यात सर्वाधिक 48.4 मि.मी. तर राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात सर्वांत कमी 21 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंतचा पाऊस (टक्केवारी )
नगर : 37.5, पारनेर 39.4, श्रीगोंदा 42.9, कर्जत 42, जामखेड 48.4, शेवगाव 43.4, पाथर्डी 45.1, नेवासा 39.5, राहुरी 21, संगमनेर 27, अकोले 41.6, कोपरगाव 31, श्रीरामपूर 21.5, राहाता 32.9.
हेही वाचा
चांगली बातमी ! महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये 235 वाघ वाढले