चांगली बातमी ! महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये 235 वाघ वाढले
पुणे : राज्यातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या गेल्या काही वर्षांत तीनवरून सहापर्यंत वाढविण्यात आली असून, राज्यातील व्याघ्र प्रकल्पांतील क्षेत्र दोन हजारांहून अधिक चौरस किलोमीटरने वाढले आहे. त्यामुळे वाघांची संख्या 115 वरून 350 वर पोहोचली आहे. वाघांच्या संख्येने अशी हनुमान उडी घेतल्याने देशातील वाघांमध्ये महाराष्ट्राने लक्षणीय स्थान मिळविले आहे.
वाघांच्या संरक्षणांतर्गत त्यांच्या वसतिस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करण्याचे प्रयत्न होत आहेत. वन्य वाघांची कमी होणारी संख्या चिंताजनक आहे. भारतात सध्या सुमारे 3167 पर्यंत वन्यवाघ आहेत. वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने वाघांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले. परिणामी, पाळीव प्राणी खातात म्हणूनही वाघांवर विषप्रयोग करून त्यांची शिकार करण्यात आली. 1973 साली 9 व्याघ्रप्रकल्प होते. त्या वेळी खूप कमी वाघ होते. परंतु, आता 53 व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यामध्ये वाघांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.
राज्यातील व्याघ्र प्रकल्प
नाव एकूण क्षेत्रफळ (चौकिमी) अतिसंरक्षित बफर क्षेत्र
ताडोबा-अंधारी 1727.59 625.82 1101.77
पेंच 741.22 257.26 483.96
मेळघाट 2768.53 1500.49 1268.04
सह्याद्री 1165.57 600.12 565.45
नवेगाव-नागझिरा 656.36 – –
बोर 138.12 – –
राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढल्याचा हा परिणाम असून, आगामी काळात वाघांचे संरक्षण वाढविणे गरजेचे आहे. विविध नॅशनल पार्क, व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांना त्यांची मोकळीक मिळाली असून, अपेक्षित संरक्षणही मिळत आहे. त्यामुळे 115 वरून 350 वाघांची संख्या झाली आहे.
– किशोर रिठे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीपूर्वी भारतामध्ये 1973 साली केवळ 9 व्याघ्र प्रकल्प होते. परंतु, आता 53 व्याघ्र प्रकल्प झाले असून, त्यात सहा प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात 3167 वाघांची संख्या असून, राज्यात आता 350 वाघ झाले आहेत. वाघांना लागणारे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असून, जंगलाचे संरक्षण
उत्तम होत आहे.
– अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
हेही वाचा :
राज्यात पावसाची जोरदार बॅटींग ! सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस