कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भगवंता प्रतिभक्त जसा भाव विश्वास ठेवतो, तसाच भगवंत परमात्मा त्या भक्तावर कृपा करतो भगवान परमात्मा हा समदर्शी आहे . ज्याच्या मुखात हरिनाम नाम नाही अशा मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे, असा हरिनामाचा महिमा महंत रामगिरी यांनी भागवत कथेत विविध दाखले देत कथित केले. श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना महंत रामगिरी बोलत होते. रामगिरीजी म्हणाले, जसे गाय आहे पण गाईला दूध नाही.
मंदिर आहे, पण दिवा नाही. वृक्ष आहे, पण वृक्षाला फळ नाही. त्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या मुखात हरीराम नाही त्या मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे. भगवान परमात्मा हा समदर्शी आहे. गोपिकांनी काम भावनेने भगवंताची भक्ती केली. भगवंताच्या कृपेचे त्या भक्ताला फळ मिळत असते. क्या भरोसा है, जिंदगी का साथ देती नही है वो किसी का असे भजन म्हणून अंतकरणात असलेले विकार संपवण्यासाठी गृहस्थ आश्रम आहे. ऋष म्हणजे ज्ञान जो ज्ञानाने शोभतो त्याला ऋषभ म्हणतात. ऋषभचे पुत्र कलयुगात नवनाथ, नव योगेश्वर म्हणून कलयुगात प्रकट झाले. 24 तीर्थकारापैकी एक ऋषभ देव आहे अनुकूल परिस्थितीत वैराग्य करावे.
सूर्याला अर्ध्य देणे ही भारतीय संस्कृती आहे. ज्याला उत्तम आरोग्य प्राप्ती करायची त्याने प्रातकाळी सूर्याला अर्ध्य द्यावे. सूर्यप्रकाश व जल यांच्या संयुक्ताने सप्तरंग तयार होतात सप्तरंगातून व्हिटॅमिन मिळते व शरीर निरोगी होते. मै तो रमता जोगी राम मेरा दुनिया से क्या काम या भावनेतून भक्ती करावी असे सांगून भरत राहू गण संवादाचे त्यांनी कथन केले. नरक हे भगवंताने जीवाच्या कल्याणासाठी केलेले आहे. पाप कर्म केले तर प्रत्येक पाप कर्माचे वेगवेगळे फळ मिळते.
मनुष्याला सुंदर अशी वाणी दिली आहे ,या वाणीतून, या मुखातून सदैव हरिनाम घ्यावे पण हरीचे भजन न केल्यास नरक यातना भोगाव्या लागतात. हरी नामात पाप घालवण्याची क्षमता आहे. वाल्या कोळी राम नामामुळे तरला. हरिनाम हे कल्याणासाठीच आहे ते कोणत्याही उद्देशाने करा त्यात कल्याणच असते . जसे साखर कशी खाल्ली तरी तिचा गोडपणा सोडत नाही. त्याचप्रमाणे हरिनामाचे आहेत.
पुराणातील भक्तीचे विविध दाखले त्यांनी चौथ्या पुष्पात दिले. श्रीकृष्ण जन्माचा जिवंत देखावा व्यासपीठावर चौथ्या पुष्पात सादर करण्यात आला. वासुदेवाची व्यक्तिरेखा कोल्हार येथील पोलीस पाटील सुखलाल खर्डे यांनी केली. तर नंदलाल यांची व्यक्तिरेखा पंढरीनाथ खर्डे यांनी साकारली. यशोदाची भूमिका अर्चना खर्डे यांनी साकारली.
चार महिन्याच्या श्रीराज स्वप्निल निबे हे बालक श्रीकृष्ण बनवून वासुदेवाच्या डोक्यावरील टोपलीत आपले हातपाय हलवीत हास्य करीत होते. या चिमुकल्या श्री राजने मात्र उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले. वृंदावन येथून आलेले कृष्णकुमार यांनी या सर्वांची वेशभूषा व रंगभूषा केली. श्रीकृष्ण जन्म देखावा हा खूपच लक्षवेधी ठरला. या देखावाने उपस्थित भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडले दिवसेंदिवस भागवत कथेसाठी गर्दी होत आहे. यामुळे कोल्हार भगवतीपुर नगरी दुमदुमून आहे. नवनाथ महाराज म्हस्के व मधु महाराज कडलग यांनी या देखाव्याचे सूत्रसंचालन केले.
हेही वाचा