![नगर : रूईछत्तीशी-वाळकी रस्ता खड्ड्यात ! जिल्हा नियोजन निधीचा बोजवारा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2Fruichattishi.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
रूईछत्तीशी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. खासदार व आमदार यांनी मोठ्या प्रमाणावर निधीची पूर्तता रस्त्यांसाठी केली आहे. मात्र, नगर तालुक्यातील रूईछत्तीशी-वाळकी या रस्त्याची सर्वत्र खड्डे पडल्याने पूर्णपणे वाट लागली आहे. या रस्त्यावरून सातत्याने वाहनांची वर्दळ असते. नगर- सोलापूर महामार्गावरून दौंड मार्गावर जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. तसेच, रूईछत्तीशी आणि वाळकी ही आर्थिकदृष्ट्या मोठी गावे असल्याने, या गावांत मोठा बाजार भरतो. त्यामुळे लोकांची देवाणघेवाण या दोन गावांवर अवलंबून आहे. नगर-सोलापूर महामार्गाचे काम चालू असल्याने, नगरला जाण्यासाठी या पर्यायी रस्त्याचा वापर केला जातो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. वडगाव, बाबुर्डी, वाळकी, गुणवडी या गावांतील मुलांना शाळेत येण्यासाठी हा मार्ग सोपा असल्याने विद्यार्थ्यांची देखील वर्दळ या रस्त्यावरून पाहायला मिळते.
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर गेल्या दीड वर्षापासून प्रशासक राज असल्याने, ग्रामीण भागातील अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. ग्रामीण रस्ते, जनसुविधा, वीज, पाणी अशा अनेक समस्यांनी ग्रामीण भागाला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेतून रस्त्यासाठी निधी वितरित केला जातो. सध्या संपूर्ण निधी जिल्हा नियोजन आयोगाच्या अखत्यारीत असून, त्यावर पालकमंत्री यांचा अधिकार असतो. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सगळ्या ग्रामीण रस्त्यांसाठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचते. प्रवास करताना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांची मालिका सुरुच असते.
हे ही वाचा :