

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृतसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघात फक्त बँकिंगच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या दृष्टीने न घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आता घडायला लागल्या आहेत. त्यामुळे विरोधक उगाच निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केली आहे. आमदार पवार म्हणाले, मतदारसंघातील बँकिंग सेवा वाढविण्यासाठी कोरोना काळापासूनच आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची दिल्लीत भेट घेऊन पाठपुरावा केला.
यासाठी लागणार्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा मतदारसंघात अधिक प्रमाणात सुरू केल्या. सर्वसमावेशक बँकिंग सेवा वाढविण्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी केली. केंद्रीय मंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ पुढील कार्यवाहीचे आदेशही दिले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर बँकेच्या सेवा सुधारल्याने नागरिकांना फायदा होत आहे. स्टेट लेव्हल बँकिंग कमिटी अंतर्गत या सुविधांसाठी मान्यता मिळण्यासाठीही केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या कमिटीच्या बैठकीसाठी मान्यता घेऊन प्रस्ताव पुढे पाठविला. तसेच, लीड बँकेने सर्व्हे यापूर्वीच पूर्ण केला आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले.
कोणतीही मंजुरी मिळवायची असेल तर, आवश्यक कागदपत्रे सादर करून पाठपुरावा करावा लागतो. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. परंतु, केंद्रीय मंत्र्यांना फोन करून मंजुरी मिळविल्याचे सांगणार्या विरोधकांना जनता चांगलीच ओळखून आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले.
हेही वाचा