नगर : वाघोली ग्रामपंचायत राज्यात प्रथम ; ‘माझी वसुंधरा’ अभियानात दीड कोटीचा पुरस्कार
ढोरजळगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात अडीच ते पाच हजार लोकसंख्या गटातून एक कोटी रुपयांचा व भूमी या संकल्पनेतील अत्युत्कृष्ट कामगिरीबद्दलचा 50 लाख रुपयांचा, असे दोन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देऊन राज्य सरकारने वाघोली (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीस सन्मानित केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी (ता. 5) मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जर्हाड यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाट, विस्तार अधिकारी दिगंबर भांड, सरपंच सुश्मिता भालसिंग, उमेश भालसिंग, ग्रामसेविका जनाबाई फटाले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या वर्षी ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या तिसर्या टप्प्यात अडीच ते पाच हजार लोकसंख्येच्या गावांसाठी एक कोटी रुपयांचा राज्यस्तरीय व भूमी या संकल्पनेच्या संवर्धन व जतनासाठी केलेल्या अत्युत्कृष्ट कामगिरीसाठी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला. या अभियानात गेल्या वर्षी ही वाघोली गावाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटाकावत नावलौकिक मिळविला होता.
वाघोली ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर मिळालेला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या विविध कामांचा व उपक्रमांचा हा गौरव आहे. यापुढे ही गाव आणखी स्वावलंबी व समृद्ध करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करू.
-सुश्मिता भालसिंग, सरपंच
हे ही वाचा :