Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रचारासाठी पं. नेहरू | पुढारी

Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रचारासाठी पं. नेहरू

उमेश काळे

हैदराबाद मुक्‍तिसंग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला होता. स्टेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले स्वामीजी हे 1952 ला गुलबर्गा तर 1957 ला छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघातून विजयी झाले होते.  संभाजीनगरात त्यांच्या विरोधात भाकपचे मुंबई येथील नेते शांताराम मिरजकर उभे होते. या निवडणुकीत स्वामीजींना 76 हजार 274 तर मिरजकर यांना 57 हजार439 मते पडली. स्वामीजी विजयी झाले. या निवडणुकीतील एक आठवण तत्कालिन जिल्हाधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी त्यांच्या हयातीत (तेव्हा भुजंगरावांचे वय 102 वर्ष होते) काही पत्रकारांना सांगितली होती.
ती म्हणजे स्वामीजींच्या प्रचारासाठी तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे संभाजीनगरात आले होते. शहरातील आमखास मैदानावर त्यांची सभा झाली. सुभेदारी विश्रामगृहात नेहरूंची उतरण्याची व्यवस्था केली होती व तेथून ते वेरूळला गेले होतेे. या निवडणुकीत नेहरूंजींचा करिष्मा जनमतावर प्रभाव टाकणारा होता.

Lok Sabha Election 2024 | ‘स्वामीजी तुम्ही जिंकलात, मी हरलो..’

स्वामीजींना (पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर) राजकारणात फार रस नव्हता. हैदराबाद मुक्‍तिसंग्रामानंतर  स्टेट काँग्रेसमधील काही विषय त्यांच्या स्वभावाला पचनी पडणारे नव्हते. हैदराबाद संस्थानात मराठी, तेलगू, कानडी, उर्दू भाषिक (मराठवाडा, कर्नाटक व आंध्रचा काही भाग) होते. भाषावर पुनर्रचना न करता तिन्ही भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी नेहरूंची इच्छा होती. 1958  मध्ये हैदराबादेत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे स्वामीजी स्वागताध्यक्ष होते. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाडा महाराष्ट्रात विलिन करावा, असा आग्रह धरला. त्यास नेहरूंनी विरोध केला.  पण तोपर्यंत व्दिभाषिक राज्याच्या पुनर्विचाराच्या मागणीने पुन्हा जोर धरला. राज्य पुनर्रचना विधेयक दुरूस्त्यांसह चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले. 51 सदस्यांच्या समितीत स्वामीजी होते. दुरूस्त्यांह हे विधेयक 14 एप्रिल, 1960 रोजी संमत झाले व संयुक्‍त महाराष्ट्राचा मार्ग मोकळा झाला. विधेयक संमत झाल्यानंतर पंडितजी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावळ गेले आणि म्हणाले,  ‘स्वामीजी तुम्ही जिंकलात, मी हरलो..’ नेहरूंच्या उदारतेने स्वामीजींचे मन भरून आले. स्वामीजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. (संदर्भ : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ, प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ).
स्वामीजीं च्या आग्रही भूमिकेमुळे भाषावार पुनर्रचना सोपी झाली, कदाचित स्वामीजी लोकसभेत गेले नसते तर भाषावार विषयाला आणखी फाटे फुटले असते. पुनर्रचनेचे महत्त्वाचे काम झाल्यानंतर त्यांनी नेहरूंकडे राजकीय निवृत्तीचा मनोदय बोलून दाखविला. नेहरूंनी त्यास जड अंतकरणाने मान्यता दिली. त्यानंतर स्वामीजी कोणतीही निवडणूक लढले नाहीत. खादीचा प्रचार, भूदान, शैक्षणिक कामाला त्यांनी वाहून घेतले. एक कांबळी, भगव्या कपड्याचा एक जोड आणि पायातील चप्पल यांशिवाय त्यांची स्वत:ची अशी काहीच मालमत्ता नव्हती. त्यांच्या मनावर सूरदासांच्या काव्याचे संस्कार होते. चिंतन, मनन, वाचन यांतून ते नेहमी विद्यार्थी व इतरांशी संवाद साधत. ते आदर्श विद्यार्थी, प्रयोगशील शिक्षक, आदर्श सल्लागार, संसदसदस्य, राजकारणी, सन्यस्त स्वातंत्र्य सेनानी होते.(संदर्भ : मराठी विश्‍वकोश)

हेही वाचा 

Back to top button