“नितीश कुमारांनीच भाजपविरोधात..” : शिवसेना ठाकरे गटाचा हल्‍लाबोल | पुढारी

"नितीश कुमारांनीच भाजपविरोधात.." : शिवसेना ठाकरे गटाचा हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारच्‍या राजकारणात मागील तीन दिवसांमध्‍ये कमालीच्‍या वेगाने घडामोडी घडल्‍या. मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीशकुमारांनी राष्‍ट्रीय जनता दलासह काँग्रेस महाआघाडीची साथ सोडली. त्‍यांनी पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सत्ताग्रहण करत मुख्‍यमंत्रीपदाची शपथही घेतली. या संपूर्ण घडामोडीवर भाजपविरोधी पक्षांनी नितीश कुमारांवर टीका केली आहे. आज (दि.२९) शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्‍या अग्रलेखातून नितीश कुमारांवर हल्‍लाबोल करण्‍यात आला आहे. ( Uddhav Thackeray Shiv Sena mouthpiece ‘Saamana’ Criticize Bihar Cm Nitish Kumar )

भाजपविरुद्ध नितीश कुमारांनीच विरोधी पक्षांना एकत्र आणले…

‘सामना’च्‍या अग्रलेखात म्‍हटलं आहे की, नितीश कुमार यांनीच भाजपविरोधी शक्तींना एकत्र केले. त्‍यांनी पाटण्यामध्ये विरोधी आघाडीची पहिली बैठक बोलावली होती. इंडिया आघाडीचे राष्‍ट्रीय पातळीवरील नेतृत्त्‍व नितीश कुमार करतील, असे वाटत होते. भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध विरोधी पक्षांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. त्यासाठी नितीशकुमार यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सोबत आणले होते.
आता त्यांचे समर्पण सर्वांनाच दिसू लागले आहे. ( Uddhav Thackeray Shiv Sena mouthpiece ‘Saamana’ Criticize Bihar Cm Nitish Kumar )

पाटणा येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांची पहिली बैठक झाली. त्‍यावेळी भाषण करताना नितीश कुमार म्हणाले होते की, देश धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून, देशाच्या हितासाठी आपण मतभेद विसरून लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र आले पाहिजे. पाटण्यात नितीश यांनी मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या. नंतर ते बेंगळुरू, मुंबई आणि दिल्लीतील इंडिया आघाडीच्‍या सभांनाही गेले होते. भाजपविरुद्धच्या लढाईसाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत समर्पित होते, मात्र आता त्यांचे समर्पण सर्वांनाच दिसू लागले आहे. नितीशकुमारांनी पुन्‍हा एकदा गट बदलला, असेही या अग्रलेखात नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button